येत्या 16 फेब्रुवारी रोजी वसंत पंचमीच्या दिवशी तुकाराम महाराज अवतीर्ण दिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याच शब्दात आपण या जगामध्ये कोणत्या कारणासाठी आलो याविषयी थोडेसे वर्णन या लेखामध्ये करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. एका अभंगात तुकाराम महाराज म्हणतात धर्माचे पाळण । करणे पाखांड खंडण ।।1।। हेचि आम्हा करणे काम । बीज वाढवावे नाम ।।2।। तीक्ष्ण उत्तरे । हाती घेऊनि बाण फिरे ।।3।। नाही भीड भार । तुका म्हणे सानथोर ।।4।। अर्थात सर्व पाखंड (वेद विरुद्ध मतांचे खंडण करून वेद प्रतिपादित) धर्म रक्षण (पालन) करावा, प्रत्येकाच्या हृदयात भगवंताच्या पवित्र नामाचे बीजारोपण करण्यासाठी प्रचार करावा, हेच काम आम्हाला करावयाचे आहे आणि हरिनामाचा प्रचार करताना कठोर शब्दरूपी बाण हातामध्ये घेऊन आम्ही नेहमी फिरत असतो. हे पवित्र कार्य करताना आम्ही कोणी लहान अथवा थोर आहे याची भीड बाळगत नाही. या प्रसिद्ध अभंगात तुकाराम महाराज या भौतिक जगामध्ये येण्यामागचा उद्देश काय होता हे स्पष्टपणे सांगत आहेत. त्याचप्रमाणे आणखी एका अभंगात आपण कुठले रहिवासी आहोत आणि आपण कोणत्या कारणासाठी आलो आहोत याचे वर्णन करताना तुकाराम महाराज म्हणतात आम्ही वैकुंठवासी । आलो याची कारणासी । बोलिले जे ऋषी ।साच भावे वर्ताया ।।1।। झाडू संतांचे मार्ग । आडरानी भरले जग । उच्छिष्टचा भाग । शेष उरला तो सेवू ।। 2।। अर्थे लोपली पुराणे । नाश केला शब्द ज्ञाने । विषय लोभी मने । साधने बुडविली ।।3।। पिटू भक्तीचा डांगोरा । कळिकाळाशी दरारा । तुका म्हणे करा । जयजयकार आनंदे ।।4।। अर्थात आम्ही वैकुंठात वास्तव्य करणारे आहोत पण व्यासदेव ऋषींनी दिलेल्या वेदप्रणीत मार्गाचे पालन करून दाखवण्यासाठी, या भौतिक जगात आलो आहोत. आम्ही अशा वैष्णव संतांनी आखून दिलेला मार्ग साफ करू, कारण या मार्गावर अज्ञानाचे रान वाढले आहे. व्यासासारख्या संतासारखे शब्दरूपी उच्छिष्ट आम्ही सेवन करू. सर्व वेद पुराणाचे सार आहे हरिनाम, पण विषयलोभी व्यक्तींनी वेदांच्या नावाखाली स्वतःच्या विचारांचा शब्दघोळ करून लोकांना भ्रमित केले आहे, पारमार्थिक साधने दूषित केली आहेत त्यासाठी आम्ही हरिभक्तीचा डांगोरा पिटू (प्रचार करू) व त्यायोगे कळिकाळालाही दरारा (भय) उत्पन्न होतो त्या हरिनामाचा आनंदाने जयजयकार करू. या अभंगातून हे स्पष्ट होते की तुकाराम महाराज हे वैकुंठधामातून विशेष कार्य करण्यासाठी व सर्वांचा उद्धार करण्यासाठी स्वेच्छेने अवतीर्ण झाले होते. कलियुगातील अज्ञानी लोक वेदव्यासांनी दिलेला गीता-भागवत या शुद्ध ज्ञानाचा त्याग करून तथाकथित भोंदू, धर्माचे शून्य ज्ञान असलेले धर्मप्रचारक, समाज सुधारकांच्या वेशात वावरणारे धर्मद्वेषी, भगवी, श्वेत वस्त्रे धारण करून वैराग्याची नक्कल करणारे तथाकथित साधू संत गुरु, निरनिराळय़ा नवीन अधर्म मार्गाचे धर्माच्या नावाने प्रचार करणारे तथाकथित योगी, ज्ञानी, विद्वत्तेच्या प्रभावाने साध्या सरळ समाजाला शुद्ध हरिभक्तीच्या मार्गापासून दूर नेणारे दुराचारी इत्यादींचे उच्चाटन करून सरळ सोपा हरिभक्तीचा मार्ग स्वतःच्या जीवन उदाहरणावरून शिकविण्यासाठी तुकाराम महाराज अवतीर्ण झाले हे या अभंगातून कळते.
त्याचप्रमाणे या जगातील लोकांचे दुःख कमी करण्यासाठी हरिनामाचा प्रचार करणे हे कार्य मागील अनेक जन्मामध्ये करीत आलो आहोत हे सांगताना तुकाराम महाराज म्हणतात, मागे बहुत जन्मी । हेच करीत आलो आम्ही । भवतापश्रमी । दुःखे मेळवू पिडले निववू त्या ।।1।। गरजू हरीचे पवाडे । मेळवू वैष्णव बागडे । पाझर रोकडे । काढू पाषाणामध्ये ।।2।। भावशुद्ध नामावली । हर्षे नाचू पिटू टाळी । घालू पायांतळी । कळिकाळ ते बळे ।।3।। कामक्रोध बंदखाणी । तुका म्हणे दिले दोन्ही । इंद्रियाचे धनी । आम्ही झालो गोसावी ।।4।। अर्थात संसारतापाच्या कष्टाने जे दुखी झाले असतील त्यांना हरिनामाची शीतलता देण्याचे कार्य आम्ही अनेक जन्मापासून करीत आलो आहोत. आम्ही तर शूर वैष्णवांचा समुदाय जमवून हरिनाम संकीर्तनाच्या गजराने पाषाणहृदयी माणसाच्या हृदयातून करुणेचे पाझर फोडू. श्रीहरिचे नाम आम्ही शुद्ध अंतःकरणाने घेऊ आणि मोठय़ा आनंदाने नाचत नाचत टाळय़ा वाजवून कळिकाळालाही पायाखाली तुडवू कारण आम्ही कामक्रोधादि सहा विकार बंदिखान्यात टाकून इंद्रियाचे मालक असे गोसावी झालो आहोत. असे हे तुकाराम महाराजांसारखे असामान्य भगवद्भक्त आपल्यासारख्या सामान्य बद्ध जीवांना वैकुंठ धामाला परत नेण्यासाठी मार्गदर्शन करण्यास भगवंताच्या प्रसन्नतेसाठी वैकुंठ सोडून येतात आणि आपल्यासारखेच या जगात वावरतात, पण हरिभक्तिपरायण जीवन कसे जगावे हे स्वतःच्या उदाहरणावरून दाखवून देतात.
भगवद्भक्तीचा प्रचार करताना नास्तिक, कर्मकांडी इत्यादी लोकांचा अज्ञानामुळे होणारा विरोध अपेक्षित असतोच त्याचबरोबर अनेक अपसंप्रदाय, भोंदू गुरु, हेंदरी सेंदरी दैवते, भोंदू साधू, अंधश्रद्धा, कर्मकांड अशा अनेक हरिभक्तीमध्ये अडथळे निर्माण करणाऱया मार्गाचा तुकारामांनी बीमोड करून पाखंड खंडनाचे कार्य केले. दुसऱयांचे दुःख वैष्णवांना सहन होत नाही म्हणून बुडती हे जन पाहवेना डोळा । म्हणुनी कळवळा येतसे या भावनेने तुकारामांनी हरिभक्ती व हरिनाम हा सर्व दुःखावरचा शाश्वत उपाय सर्वाना देण्यासाठी जीवन समर्पित केले. प्रामाणिक साधू, वैष्णव कधीही गीता-भागवत शास्त्र सोडून स्वतःचा उपदेश करीत नाही. सर्व वेदांचे सार भगवान श्रीकृष्णाची शरण घेणे हेच आहे आणि हरिनाम संकीर्तन हाच युगधर्म आहे हा उपदेश त्यांच्या अभंगातून वारंवार प्रकट होतो. त्यांच्या उपदेशाचे सार पुढील अभंगातून स्पष्ट होते. आता तरी पुढे हाचि उपदेश । नका करू नाश आयुष्याचा ।।1।। सकळांच्या पाया माझे दंडवत । आपुलाले चित्त शुद्ध करा ।।2।। हित ते करावे देवाचे चिंतन । करुनिया मन एकविध ।।3।। तुका म्हणे लाभ होय तो व्यापार । करा काय फार शिकवावे।।4।। अर्थात माझा सर्वाना हाच उपदेश आहे की आपल्या आयुष्याचा नाश करू नका. सर्वांच्या पायावर नम्रपणे मस्तक ठेवून मी विनंती करत आहे की सर्वानी आपले चित्त शुद्ध करून भगवान श्रीकृष्णाची भक्ती करावी. एकाग्र चित्ताने मन शुद्ध करून भगवान श्रीकृष्णाचे नामस्मरण करण्यातच मनुष्य जन्माचे हित आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ‘आता तुम्हाला फार काय शिकवावे? ज्यामध्ये मनुष्य जन्माचे हित आहे असा व्यापार तुम्ही करा’ 400 वर्षांनंतरही तुकाराम महाराजांबद्दल प्रत्येकाच्या हृदयात आस्था, प्रेम, आजही कायम आहे. त्याच्या पवित्र जन्मदिनी त्यांनी दिलेल्या या उपदेशाचे पालन जर आपण प्रामाणिकपणे केले तर त्यांच्याबद्दल असलेला अभिमान सार्थ ठरेल. दंभ आणि कलह यांनी व्यापून गेलेल्या आपल्या जीवनामध्ये याचा प्रत्येकाने जरूर विचार करावा ही प्रार्थना.
वृंदावनदास