हैदराबादमध्ये 216 फूट उंचीच्या पुतळय़ाचे अनावरण
हैदराबाद / वृत्तसंस्था
वैष्णव संप्रदायाचे संत स्वामी रामानुजाचार्य यांच्या 216 फूट उंच पुतळय़ाचे उद्घाटन आणि लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सायंकाळी केले. हैदराबादमध्ये स्थापन झालेल्या या पुतळय़ाला ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’ असे नाव देण्यात आले आहे. या भव्य पुतळय़ाच्या लोकार्पणानंतर रामानुजाचार्यजींनी जातीभेद संपवण्याचे काम केल्याचे पंतप्रधान म्हणाले. रामानुजाचार्यजींनी यादव गिरीवर नारायण मंदिर बांधले आणि दलितांना उपासनेचा अधिकार देऊन समानतेचा संदेश दिला. त्यांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी अनेक प्रयत्न केल्याचे सांगत जे समाजातील वाईटाशी लढतात, जे समाज सुधारणा घडवतात, त्यांना समाजात मान-सन्मान मिळतो असेही पंतप्रधान याप्रसंगी म्हणाले.
आज रामानुजाचार्यजी आपल्याला समानतेचा संदेश एका विशाल पुतळय़ाच्या रूपात देत आहेत. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’ या मंत्राने आज देश आपल्या नवीन भविष्याचा पाया रचत आहे. भेदभाव न करता विकास झाला पाहिजे, त्यात सर्वांचा समावेश असावा. ज्यांच्यावर शतकानुशतके अत्याचार झाले, त्यांनी पूर्ण सन्मानाने विकासाचे भागीदार व्हावे, यासाठी आजचा बदलणारा भारत एकसंघ प्रयत्न करत असल्याचे मोदींनी आपल्या भाषणातून सांगितले. वैष्णव संत रामानुजाचार्य यांच्या 1000 व्या जयंतीनिमित्त सुरु झालेल्या या कार्यक्रमामध्ये 2 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत 1 हजार 35 कुंडांतून 14 दिवस महायज्ञाचा कार्यक्रम केला जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवारी हैदराबादच्या दौऱयावर होते. पंतप्रधानांच्या हस्ते 11 व्या शतकातील भक्तीमार्गीय संत रामानुजाचार्य यांच्या 216 फूट उंच पुतळय़ाचे अनावरण करण्यात आले. तत्पूर्वी हैदराबादमधील पट्टणसेरू येथे आंतरराष्ट्रीय अर्ध-उष्ण कटिबंधीय कृषी संशोधन केंद्राच्या पन्नासाव्या वर्धापन दिनाच्या सोहळय़ाचा आरंभ करण्यात आला. यावेळी आंतरराष्ट्रीय अर्ध-उष्ण कटिबंधीय कृषी संशोधन केंद्राच्या खास तयार केलेल्या बोधचिन्हाचे अनावरण देखील त्यांच्या हस्ते झाले. तसेच या सोहळय़ाच्या संस्मरणार्थ टपाल तिकीट प्रदर्शित करण्यात आले.
अप्रतिम पुतळा, मंदिरांची मांदियाळी
रामानुजाचार्य हे महान सुधारक होते. ज्यांनी 1 हजार वर्षांपूर्वी समाजातील अनि÷ रूढी परंपरांना छेद देण्याचा प्रयत्न केला. रामानुजाचार्य यांचा पुतळा म्हणजे समानतेचा पुतळा आहे. हा जगातील दुसरा सर्वात मोठा बसलेला पुतळा आहे. येथे मूर्तीसह 108 मंदिरे बांधण्यात आली असून 120 किलो सोन्याचा वापर करून आचार्यांची छोटी मूर्तीही तयार करण्यात आली आहे. अयोध्येत 1,100 कोटी रुपये खर्चून उभारल्या जाणाऱया राम मंदिरापेक्षा या प्रकल्पावर 1,400 कोटी रुपयांहून अधिक खर्च झाला आहे. वैष्णव पंथाचे संत चिन्ना जेयर स्वामी यांच्या देखरेखीखाली हा प्रकल्प पूर्ण झाला आहे.
पंचधातूंचा वापर
ही मूर्ती 11 व्या शतकातील भक्ती शाखेचे संत श्री रामानुजाचार्य यांच्या स्मरणार्थ बनवण्यात आली आहे. ही मूर्ती सोने, चांदी, तांबे, पितळ आणि जस्त यांच्या मिश्रणाने बनलेली ‘पंचधातू’ आहे. हा पुतळा 54 फूट उंच इमारतीवर उभारला आहे. त्या इमारतीमध्ये डिजिटल वैदिक ग्रंथालय व संशोधन केंद्र, प्राचीन भारतीय लिखाण, नाटय़गृह, शैक्षणिक गॅलरी आहे.