प्रा.अनिल चौधरी यांचे प्रतिपादन : खानापूर येथील रावसाहेब वागळे कॉलेजमध्ये मराठी भाषा दिन साजरा
प्रतिनिधी / बेळगाव
मराठी ही संस्कृत भाषेच्या जवळची भाषा असून ती एक ज्ञानभाषा म्हणून ओळखली जाते. मराठी भाषेला संत साहित्याने समृद्ध केले. संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांनी मराठी सातासमुद्रापार नेली. तर राम गणेश गडकरी, वि. वा. शिरवाडकर, ग. दी. माडगुळकर यासारख्या साहित्यिकांमुळे मराठी भाषेला वेगळे वैभव प्राप्त झाले. त्यामुळे ही भाषा आता पुढील पिढीपर्यंत पोहोचवायची असेल तर त्यांना मराठीतून शिक्षण देणे आवश्यक आहे, असे विचार प्रा. अनिल चौधरी यांनी व्यक्त केले.
खानापूर येथील रावसाहेब वागळे कॉलेजमध्ये आयोजित ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर लोकमान्यचे संचालक प्रभाकर पाटकर, पंढरी परब, समन्वयक विनायक जाधव, प्राचार्या शरयू कदम, प्रा. बी. व्ही. पाटील, लोकमान्यचे शाखा व्यवस्थापक दिगंबर जांबोटकर उपस्थित होते.
संचालक पंढरी परब म्हणाले, मराठी भाषेवर आजवर अनेक आक्रमणे झाली. परंतु ती वेळोवेळी परतविण्यात आली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याकाळी मराठी भाषेला ऊर्जा दिल्यामुळेच आजवर ही भाषा टिकून आहे. लोकमान्य समुहाने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अनेक उपक्रम सुरू केले आहेत. कला, संगीत, नाटय़ या माध्यमातून मराठी भाषा समृद्ध केली जात असल्याचे त्यांनी
सांगितले.
प्रा. डी. व्ही. पाटील यांनी प्रास्ताविकातून मराठी भाषा व त्याबद्दलचे योगदान याविषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रगीत व स्वागतगीत सादर केले. मान्यवरांनीही आपली मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.