संदीप देशपांडेंनी माध्यमांचे मानले आभार
आॅनलाईन टीम/तरूण भारत
मुंबई : आम्ही सरकारविरोधी बोलू नये, आमचे थोबाडं बंद राहावेत यासाठी आमच्यावर खोटे आरोप दाखल केले. शिवसेना आणि हे सरकार सूडाचे राजकारण करत असल्याचा आरोप मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande)यांनी केला आहे. काल मुंबई सत्र न्यायालयाकडून संतोष धुरी (Santosh Dhuri) आणि संदीप देशपांडे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीवर निशाणा साधला.
यावेळी संदीप देशपांडे म्हणाले, मी घरी नसताना माझी मुलं आणि बायको घरी असताना तुम्ही पोलिस पाठवता हे तुम्हाला पटतं का? आज तुमचे दिवस आहेत, उद्या आमचे येतील असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी माध्यमांचे आभार मानले. तुम्ही दाखवलेल्या फुटेजवरून आम्ही कसलाही गुन्हा केला नाही हे स्पष्ट झालं आहे. मी जर धक्का लावल्याचं तुम्ही दाखवलं तर मी राजकारण सोडून देईन असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले.
प्रकरण नेमक काय?
भोंग्यांच्या विरोधात आंदोलनावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानाबाहेर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले व पोलीस गाडीत बसवण्यासाठी घेऊन जात होते. संदीप देशपांडे यांनी आम्ही तुमच्यासोबत येत असल्याचं पोलिसांना सांगितले. काही अंतर पोलिसांसोबत चालत गेल्यानंतर अचानक हे दोघेही खासगी कारमध्ये बसले आणि कार भरधाव निघून गेली. पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही उपयोग झाला नाही. या सगळ्या गडबडीत एक महिला पोलीस जखमी झाली. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.