ऑनलाईन टीम / मुंबई :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेला संबोधताना लोकल प्रवासाबाबत मोठी घोषणा केली. लसीचे दोन डोस घेणाऱ्यांना येत्या 15 ऑगस्टपासून लोकल प्रवासाची मुभा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वागत केले आहे. मात्र, यावरुन मुख्यमंत्र्यांवर निशाणा देखील साधला आहे.
सर्वांना लोकल प्रवासाची मुभा द्यावी यासाठी मनसेने आंदोलन केलं होतं. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी काल बोलताना लसीचे दोन डोस ज्यांनी घेतले आहेत त्यांना रेल्वे प्रवासाला मुभा देण्यात येणार असल्याचे सांगितले. यावरुन मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात बसून काम करत नसल्याचा आरोप विरोधक सातत्याने करत आहेत. यावरुन संदीप देशपांडे यांनी ट्विट करत टोला लगावला आहे.
‘आंदोलन, याचिका, पत्र, विनंती, त्रागा, धमकी, बातमी लावून धरणं आणि इतर अनेक उपाय या माध्यमातून लोकल 15 ऑगस्टला चालू करण्याची आपण घोषणा केली. असो आपले अभिनंदन, आता आपण मंत्रालयात बसून लोकांचे प्रश्न येत्या 15 ऑगस्टपासून सोडवाल यासाठी याचिका करू का आंदोलन हे ही सांगा, असा उपहासात्मक टोला देशपांडे यांनी लगावला आहे.