ऑनलाईन टीम / मुंबई :
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मशिदीबाहेरील लाऊडस्पीकर काढावेत, अन्यथा मशिदीसमोर हनुमान चालिसा लावू, असा इशारा दिला होता. त्यानंतर आज रामनवमीचे औचित्य साधून मनसेने शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. मनसेने शिवसेनेचे मुख्यालय असलेल्या शिवसेना भवनाबाहेर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा पठण केली. त्यावर शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी स्टंटबाजीला महत्त्व देत नाही. ‘प्राण जाये पर वचन न जाय’ असं आमचं हिंदुत्व आहे. मुळात संपलेल्या पक्षांवर मी बोलत नाही’, अशी जळजळीत टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
आदित्य ठाकरे यांनी आज लोअर परेल ब्रीजवर कामाची पाहणी केली. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, रघुकुल रीत सदा चली आये प्राण जाये पर वचन ना जाये’ जनतेला दिलेली वचने आम्ही पूर्ण करत आहोत. विरोधक आणि आमच्यात हाच फरक आहे, आम्ही काम करतोय ते दिसतंय. स्टंटबाजीला मी महत्त्व देत नाही आणि संपलेल्या पक्षांवर मी बोलत नाही.
दरम्यान, शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱयांनी केलेल्या हल्ल्याविषयी बोलताना ते म्हणाले, ‘शरद पवार यांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेला हल्ला निषेधार्थ आहे. राज्याच्या राजकारणात असा प्रकार कधी घडला नाही. राजकारण खालच्या पातळीवर कधीच झालं नव्हतं, असेही ते म्हणाले.