ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारत देशात 3 मे पर्यंत लॉक डाऊन वाढवला जात आहे. अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली.
कोरोना, लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
या संकटाच्या काळात प्रत्येकजण एखाद्या सैनिका प्रमाणे कर्तव्य निभावत आहे, हीच खरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली आहे. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. मी सर्व जनते मार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करतो.आपल्या देशात विविध उत्सव साजरे केले जातात. लॉक डाऊन च्या काळात नववर्षाचे स्वागत झाले, परंतू लोकांनी नियमांचे पालन करत सर्व सण, उत्सव घरात राहून साजरे केले, ही गोष्ट कौतुकास्पद आहे.
पुढे ते म्हणाले, महिन्याभरापूर्वी जे देश आपल्या बरोबरीत होते, त्या देशात आता कोरोनाच्या 25 ते 35 टक्के केसेस वाढल्या आहेत. या काळात आपण जो मार्ग स्वीकारला तोच बरोबर आहे. ते म्हणजे सोशल डिस्टन्सिंग.
आपण समस्या दिसली त्यावेळीच आपण उपाययोजना केल्या. अनेक सार्वजनिक स्थळे तातडीने बंद केली. भारताने योग्य निर्णय वेळीच घेतल्यामुळे अनर्थ टळला आहे. सद्य स्थितीत कोणत्याही देशाशी तुलना करणे योग्य नाही. परंतू भारतच्या तुलनेने इतर देशात कोरोनाच्या केसेस तीस टक्क्यांनी जास्त आहेत. आपण स्वीकारलेला मार्ग आज अनेक देशांनी स्वीकारला आहे.
पुढे ते म्हणाले, 20 एप्रिल पर्यंत प्रत्येक प्रदेशाचे मूल्यांकन केले जाणार असून जेथे नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाईल, तेथील नियम काही प्रमाणात शिथिल केले जातील. पण त्यांना काही अटी असतील. या अटी पाळून सुद्धा त्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव आढळला तर शिथिल केलेले नियम रद्द करण्यात येतील, असे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
तसेच या परिस्थितीत कसे वागायचे, काय करायचे याबाबत ची नियमावली उद्या जाहीर करण्यात येणार आहे.