विविध जिल्हय़ातील ग्रामपंचायतींची पाठिंब्याची पत्रे मराठा संघटनांसह विविध संस्थांचाही पाठिंबा
प्रतिनिधी / कोल्हापूर
मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर मागण्यांकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे खासदार संभाजीराजे यांनी शनिवार 26 फेब्रुवारीपासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या आंदोलनाला राज्यभरातून प्रचंड प्रमाणावर पाळबळ मिळत आहे. कोल्हापूर, सांगली, साताऱयासह विदर्भ, मराठवाडा, कोकण येथील ग्रामपंचायतींनी पाठिंबा देणारी पत्रे संभाजीराजे यांना पाठविली आहेत. त्याचबरोबर राज्यातील विविध संस्था, संघटनांनाही आंदोलनात सहभागी होणार आहे.
आझाद मैदानावर आंदोलनाची तयारी सुरू
मुंबईतील आझाद मैदानावर सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने उपोषण आंदोलनासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. राज्यभरात आंदोलनाविषयी जनजागृतीही केली जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या मागण्या, सरकारने त्याकडे केलेले दुर्लक्ष, संभाजीराजे यांची भूमिका आदी बाबतही माहिती दिली जात आहे.
राज्यभरातून पाठिंबा
संभाजीराजे यांनी उपोषण आंदोलनाची घोषणा केल्यानंतर राज्यभरातून त्यांना विविध संस्था, संघटनांकडून जाहीर पाठिंबा दिला जात आहे. पाठिंबा देणाऱया विविध समाजाच्या संस्थांचाही समावेश आहे. दक्षिण महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भातील विविध जिल्हय़ातील ग्रामपंचायतींनी आंदोलनाला पाठबळ देणारी पत्रे संभाजीराजे यांना पाठविली आहेत.
जिल्हा, गाव, शहरस्तरावर आंदोलन
संभाजीराजे यांचे उपोषण मुंबईतील आझाद मैदानावर सुरू झाल्यानंतर त्यामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यातून सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते राज्यभरातून जाणार आहेत. राज्याच्या इतर शहरी व ग्रामीण भागातील जे मराठा बांधव मुंबईत काम, उद्योग, व्यवसायानिमित्ताने आहेत, ते देखील थेट आंदोलनात सहभागी होणार आहेत. दरम्यान, ज्यांना मुंबईत जाणे शक्य नाही, असे कार्यकर्ते आपल्या गावात, शहरात, जिल्हय़ाच्या प्रमुख स्थळी आंदोलन करून संभाजीराजेंना पाठिंबा देणार आहे.
कोल्हापूरमध्ये दसरा चौकात साखळी उपोषण
कोल्हापूर जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने संभाजीराजे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी दसरा चौकात साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सकल मराठा समाजाचे जिल्हय़ात असंख्य कार्यकर्ते मुंबईतील आंदोलनात सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत. उर्वरीत कार्यकर्ते दररोज दसरा चौकात उभारलेल्या मंडपात साखळी उपोषणाला बसणार आहेत. दरम्यान, बुधवारी मंडप उभारणीचे कामही पूर्ण करण्यात आले.
संभाजीराजेंच्या प्रमुख मागण्या
- रोडमॅप करून ‘सारथी’ संस्थेचे सक्षमीकरण करणे, निधी देणे.
-अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला भरीव आर्थिक निधी द्यावा, व्याज परतावा मर्यादेत वाढ करावी.
-ईएसबीसी व एसईबीसी आरक्षणाच्या माध्यमातून शासकीय सेवेत निवड झालेल्या मराठा उमेदवारांना नियुक्त्या द्याव्यात.
-मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्यातील प्रत्येक जिल्हय़ात पंजाबराव देशमुख योजनेतर्गंत वसतिगृह तातडीने उभारावीत.
-कोपार्डी प्रकरणातील दोषींना फाशी होण्यासाठी वेगाने सुनावणी व्हावी याकरिता राज्य सरकारने आग्रही भूमिका घ्यावी.
-आरक्षण आंदोलनात आत्महत्या केलेल्या मराठा युवकांच्या कुटुंबातील व्यक्तीला शासकीय नोकरी देण्याच्या आश्वासनाची पूर्तता करावी.
रिपाइंचा पाठिंबा, रामदास आठवलेंचा उपोषणात सहभाग
संभाजीराजे यांच्या उपोषण आंदोलनाला रिपाइंने जाहीर पाठिंबा दिला आहे. मुंबईतील आझाद मैदानावर 26 फेबुवारी उपोषणस्थळी रिपाइंचे राष्ट्रीय तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले सहभागी होणार असल्याची माहिती रिपाइंचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे यांनी दिली.