बहुजन समाजाला एकत्रित आणणार : राज्यव्यापी दौरा, सर्वांशी संवाद साधत अडचणीही घेणार जाणून
कोल्हापूर / संजीव खाडे
राज्यातील बहुजन समाजाला एकत्रित आणण्यासाठी खासदार संभाजीराजे यांनी शिवशाहू यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. बारा बलुतेदार आणि अठरा आलुतेदार यांच्यात एकजूट करून महाराष्ट्राच्या विकासासाठी पुढचे पाऊल टाकण्यासाठी शिवशाहू यात्रेचे आयोजन केले आहे. राज्य पिंजून काढून सर्वांशी संवाद साधत समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न या यात्रेच्या माध्यमातून केला जाणार असून त्या अनुषंगाने नियोजनही सुरू करण्यात आहे.
छत्रपती घराण्याचे वंशज असणाऱया संभाजीराजे यांचे राज्यात वेगळ्या प्रकारे वलय आहे. पश्चिम महाराष्ट्राबरोबर विदर्भ आणि मराठवाड्यात त्यांना मानणारा प्रचंड मोठा सर्व वर्ग आहे. तरुण वर्गात संभाजीराजेंची मोठी क्रेझ आहे. 2013 मध्ये संभाजीराजे यांनी शिवशाहू रथयात्रा काढली होती. त्यावेळी त्यांनी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हा वगळता संपूर्ण राज्य पिंजून काढले हेते. त्यातून त्यांचे नेतृत्व उभे राहिले. राज्यातील प्रत्येक तालुक्यात त्यांच्या कार्यकर्त्यांचे जाळे तयार झाले आहे. राजकीय पक्षविरहित वैयक्तिक कार्यकर्ते तयार करण्यात त्यांना यश आले. किल्ले रायगडवरील 6 जूनचा शिवराज्याभिषेकदिन सोहळा संभाजीराजे यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर नेला. त्यातून राज्यासह देशभरातील लाखो शिवभक्त त्यांच्याशी जोडले गेले. दुर्गराज रायगडच्या जतन, संवर्धन आणि पर्यटन विकासासाठी संभाजीराजे यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या स्तरावर सुरू केलेले प्रयत्न महत्वाचे ठरले आहेत.
मराठा आरक्षण आंदोलनातील सहभाग
मराठा आरक्षण आंदोलनात संभाजीराजे यांचा सहभाग अग्रभागी राहिला आहे. सर्व मराठा संघटनांना एकत्रित आणत त्यांनी आरक्षण आंदोलनाला गती दिली आहे. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय खंडपीठाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाजात खास करून युवा वर्गात निर्माण झालेला रोष, खदखद सरकार दरबारी मांडण्याचे काम संभाजीराजे यांनी केले. राज्य सरकारनेही संभाजीराजे यांच्याबरोबर संवाद साधण्यास प्रारंभ केला आहे. आर्थिक दुर्बल घटकातील आरक्षणाला (ईडब्ल्यूएस) मराठा समाजाचा असणारा विरोध आणि त्याची कारणे संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच्या चर्चेत मांडली. त्यानंतर राज्य सरकारने ईडब्ल्यूएस आरक्षणातून मराठा समाजाला वगळण्याचा निर्णय घेतला.
मराठा समाजासह सर्व जातींची एकजूट
मराठा समाजाचे आरक्षण, इतर समस्या मांडताना आपण बहुजन समाजातील सर्व बलुतेदार, आलुतेदार यांचे आहोत. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारधारेवर बहुजन समाजाच्या विकासाचा आपला अजेंडा आहे, त्यामुळे विशिष्ट अशा एका जाती समुहाचे नेतृत्व आपण करणार नाही तर सर्व बहुजन समाजाचे प्रश्न, अडचणी, समस्या सोडविण्यास आपण बांधिल असल्याचेही संभाजीराजे यांनी स्पष्ट केले आहे. ओबीसी संघटनांचे नेते, धनगर आरक्षण संघर्ष समितीने नेते, मुस्लिम ओबीसी संघटनेचे नेते यांनी गेल्या काही दिवसांत संभाजीराजे यांची भेट घेऊन पाठिंब्याची मागणी केली आहे. त्यातून त्यांचे नेतृत्व सर्वमान्य होऊ लागले आहे.
शिवशाहू यात्रेव्दारे राज्य पिंजून काढणार
राज्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, मध्यमवर्गीय यांच्या समस्या, बेरोजगार युवकांचे, महिलांचे, वंचितांचे प्रश्न जाणून घेण्याबरोबर त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी शिवशाहू यात्रा काढण्याचे नियोजन असल्याचे संभाजीराजे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राचे समाजमन जाणून घेऊन प्रश्न सोडविणयाच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील. तो या यात्रेमागचा हेतून आहे, असेही संभाजीराजे यांनी सांगितले.
दोनहजार किलोमीटरची शिवशाहू यात्रा
शिवशाहू यात्रेचे नियोजन सुरू करण्यात आले आहे. सर्वसाधारणपणे राज्यातील दोनहजार किलोमीटरची ही यात्रा तब्बल तीन महिने सुरू राहणार आहे. दर दिवशी वीस ते पंचवीस किलोमीटरचे अंतर आणि गावागावातील नागरिकांशी संवाद असे यात्रेचे स्वरूप आहे.
बहुजन समाजाला एकत्रित करून राज्याच्या विकासासाठी शिवशाहू यात्रा काढण्यात येणार आहे. यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह आणि दबावही आहे. सध्या कोरोनाची साथ असल्याने सर्व गोष्टीची दक्षता घेऊन नियोजन करण्यात येणार आहे.
-खासदार संभाजीराजे छत्रपती