जनशक्तीच्या गटनेत्यांचा खोटा कांगावा-शिवराज मोरे यांची टीका
प्रतिनिधी / कराड
कोरोना काळातही राजकारण करून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आणलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचे काम जनशक्तीचे कथित गटनेते करत आहेत. खोट बोल पण रेटून बोल या जनशक्तीच्या प्रवृत्तींचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण गट सक्रीय आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिल्याने हा निधी मंजूर झाला असल्याचे युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
शहर काँग्रेस अध्यक्ष तथा नगरसेवक राजेंद्र उर्फ आप्पा माने, नगरसेवक इंद्रजीत गुजर, अल्पसंख्याक जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष झाकीर पठाण उपस्थित होते.
ते म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज भाजी मार्केटसाठी दोन कोटींसह अन्य विकासकामांसाठी मुख्याधिकाऱयांनी चव्हाण यांच्याकडे 8.50 कोटींच्या निधीच्या मागणीचे पत्र 13 जानेवारी 2021 रोजी दिले होते. त्यानुसार बाबांनी सार्वजनिक हिताच्या दृष्टीने खास बाब म्हणून छत्रपती संभाजी महाराज भाजी मार्केटचा वरील मजला बांधण्यासाठी दोन कोटी इतक्या निधीची मागणी 18 जानेवारी 2021 च्या पत्राद्वारे नगरविकास मंत्र्यांकडे केली होती. तो निधी नगरविकास खात्याने मंजूर केला आहे. मात्र हा मंजूर निधी आम्ही आणल्याचा कांगावा जनशक्तीचे नेते करत आहेत. जो खोटा आहे. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विकास केल्याचे भासवून ते कराडच्या जनतेची फसवणूक करत आहेत, अशी टिका मोरे यांनी केली.
राजेंद्र माने म्हणाले की, जनशक्ती आघाडीचे नेते यांनी मागील निवडणुकीत पृथ्वीराजबाबांच्या प्रतिमेचा उपयोग कराड नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केला, तो प्रयत्न यशस्वीही झाला. परंतु याच नगरसेवकांनी बाबांशी काही दिवसातच गद्दारी करून त्यांचा विश्वासघात केला. आजही बाबांनी मंजूर केलेली विकासकामे स्वतः केले असल्याचे जनतेला भासवत आहेत.
इंद्रजीत गुजर म्हणाले कि, जनशक्तीच्या नावाला हायजॅक करण्याचे काम राजेंद्र यादव यांनी केले. पृथ्वीराज बाबांच्यासह जनशक्तीच्या मूळ नेत्यांचा सुद्धा विश्वासघात जनशक्तीच्या नेत्यांनी केला. त्यामुळे हे काय कराडचा विकास करणार?, उलट त्यांनी श्रेय लाटण्याचे व विश्वासघाताचे प्रकार बंद करावेत.
झाकीर पठाण म्हणाले की, पृथ्वीराजबाबांनी कायमच कराडच्या जनतेवर प्रेम केले आहे. विकासाचा एक आश्वासक चेहरा कराडकरांनी आजपर्यंत अनुभवला आहे. बाबा मुख्यमंत्री असताना बाबांनी कराडला भरघोस निधी आणला. मुस्लीम समाजाला सुद्धा मोठा निधी वेळोवेळी बाबांनी आजपर्यंत दिला आहे. मी स्वतः बाबांकडे 2 कोटी 60 लाख इतक्या निधीच्या कामाची मागणी पत्राद्वारे केली आहे. त्यामधील काही कामे मंजूर झाली आहेत त्यामधील एक खोडशी येथील एक काम, मुस्लीम दफनभूमीस वॉल कंपाउंड करणे हे 20 लाखाचे काम मंजूर झालेले आहे. इतरही कामासाठी माननीय पृथ्वीराज बाबांचा पाठपुरावा सुरु आहे.