उचगांव /वार्ताहर
गांधीनगरसह वळीवडे, चिंचवाड परिसरात सांभाव्य पुराच्या काळात जेथे पुराचे पाणी येत नाही , अशा भागात पुरेशी वीज उपलब्ध होण्यासाठी नियोजन करा, अशा मागणीचे निवेदन करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने महावितरण उपविभाग मार्केट यार्ड (बापट कॅम्प)चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता रवींद्र महाद्वार व सहाय्यक अभियंता निवास गावडे यांना देण्यात आले.
गतवर्षीच्या महापुरामुळे बरेच दिवस गांधीनगर, वळीवडे, चिंचवाड या भागात वीज खंडित झाली होती. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय झाली. उद्योजक व व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यावर्षी असा महापूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपतकालीन स्थितीत वीज पुरवठा खंडीत होऊ नये व ग्रामस्थ व्यापाऱ्यांचे हाल होऊ नयेत व नुकसान होऊ नये याची दक्षता गांभीर्याने घ्यावी. ज्या भागात पुराचे पाणी आले नव्हते त्या भागात गतवर्षी वीज खंडित झाली होती. त्यामुळे कूपनलिका असूनही लोकांना विजेअभावी पिण्यासाठी पाणी उपलब्ध झाले नाही. वीज नसल्याने अनेकांनी आपले घरदार सोडून पाहुण्यांच्या घरी आश्रय घेतला. घरदार सोडल्यानंतर त्यांच्या घरी चोऱ्याही झाल्या. वीजेबाबत गांभीर्याने लक्ष द्यावे व संभाव्य अनर्थ टाळण्यासाठी आतापासूनच पूर्वतयारी करावी, अशी शिवसैनिकांनी अधिकाऱ्यांना सांगितले. त्यावर अतिरिक्त कार्यकारी अभियंता रवींद्र महाद्वार म्हणाले की संभाव्य पूर येणाऱ्या भागात कोणाचाही विजपुरवठा खंडीत होऊ नये यासाठी योग्य ते नियोजन करू.
यावेळी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, उपतालुकप्रमुख पोपट दांगट, शहरप्रमुख दिलीप सावंत, विभागप्रमुख वीरेंद्र भोपळे, दिपक पोपटणी, प्रफुल्ल घोरपडे, शाखा प्रमुख दिपक अंकल, नागेश शिरवटे, सुनिल पारपाणी, किशोर कामरा, राजेश सचदेव, शंकर चंदवानी, परशराम पिदवानी, पवन गजवानी, राजू सुंदरानी यांनी चर्चेत सहभाग घेतला.