प्रतिनिधी / कुरुंदवाड
संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर कुरुंदवाड नगरपालिका प्रशासनाने शहरातील कुटुंबसंख्या, पशुधन संख्या याबाबतच्या सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे. या सर्वेक्षणामुळे शहरवासियांना कोरोनाच्या पाठोपाठ महापुराचीही चाहूल लागली आहे. अगोदरच प्रशासनाने नोटिसा बजावल्या असून महापूर आला तर करायचं काय? याची धास्ती नागरिकांनी विशेषत: मागील महापुरात मोठ्या प्रमाणात फटका बसलेल्या लोकांनी घेतली आहे.
दरम्यान शहरातील कुटुंबसंख्या व पशुधनाच्या सर्वेक्षणासाठी नगरपालिका प्रशासनाने 32 कर्मचाऱ्यांचे पथक तयार केले आहे. तीन दिवसात सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत याबाबतचे सर्वेक्षण तातडीने करून त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करणार असल्याचे मुख्याधिकारी निखील जाधव यांनी सांगितले.
गतवर्षी ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरामुळे शहरवासीयांची अपरिमित हानी झाली शेतीवाडी पाण्याखाली, जनावरेही पुरात अडकली, जीवनावश्यक वस्तू वाहून गेल्या 100% शहर पाण्यात राहिल्याने शहरातील शेतकरी, कामगार, छोटे व्यवसायिकांना मोठा फटका बसला.
अचानक महापूर आल्याने शहराला जोडणारे रस्ते पाण्यात राहिल्याने महापुराचा सामना करता आला नाही. यावर्षीही चांगल्या पावसाची शक्यता सांगण्यात येत आहे. त्यामुळे आतापासूनच नागरिकांना महापुराची काळजी लागली आहे. ऐन वेळेला धावपळ व्हायला नको, यासाठी प्रशासनाकडून तयारी सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून पालिका प्रशासनाकडून माहिती संकलनाचे काम सुरू आहे. यासाठी शहराचे पंधरा विभाग केले आहेत व त्यासाठी 32 कर्मचाऱ्यांचे पथक सर्वेक्षण करणार आहे. सर्वेक्षणामध्ये कुटुंब संख्येबरोबर पशुधन संख्येबाबत माहिती संकलन करण्यात येणार आहे.
महापुरापूर्वी पशुधनासह सुरक्षित जागी स्वतः स्थलांतरित होणार की प्रशासनाकडून सुचवलेल्या जागी जाणार याबाबत या सर्वेक्षणावेळी नागरिकांना माहिती द्यावी लागणार आहे. संपूर्ण सर्वेक्षणानंतर तो अहवाल जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे सोपविण्यात येणार आहे.