विशेष प्रतिनिधी / संत गोरोबाकाका साहित्यनगरी
संमेलनाच्या उद्घाटनामध्ये संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आणि ना. धो. महानोर साहित्यावर फारसं काही बोलले नाहीत, असे मत मावळत्या संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले. त्यामुळे मावळत्या संमेलनाध्यक्ष विद्यमान संमेलनाध्यक्षांवर नाराज आहेत की काय, अशी चर्चा साहित्यवर्तुळात सुरू झाली आहे. साहित्य संमेलनाच्या दुसऱया दिवशी डॉ. अरुणा ढेरे यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या.
संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी संमेलनाध्यक्ष फादर दिब्रिटो यांनी पर्यावरण तसेच गौरी लंकेश, कलबुर्गी यांसारख्या विचारवंतांच्या झालेल्या हत्त्या अशा विषयांना स्पर्श करून आपले भाषण केले. उद्घाटक पद्मश्री महानोर यांनी शेतकरी आत्महत्या व इतर प्रश्नांवर भाष्य केले. महानोर आणि फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे तळमळीने बोलत होते. साहित्य संमेलनात गेल्या काही वर्षात समकालीन विषयावर चर्चा घडल्या आहेत आणि त्या योग्य आहेत.
साहित्यातील प्रश्न अजूनही साहित्यिकांना सुटले नाहीत. त्यामुळे अनेक वेळा साहित्याबरोबरच समकालीन घटनांवर बोलणे महत्त्वाचे ठरते, अशी भूमिका याप्रसंगी डॉ. ढेरे यांनी मांडली.
आज देशभरात साहित्यिकांवर कुठलाही दबाव नाही. लोक निर्भयपणे लिहीत आहेत असे स्पष्ट वाटते. देशभरातील घडणाऱया हिंसा या निंदनीय आहेत, विद्यार्थ्यांवर हल्ले होत असतील तर त्याच्या वेगळ्या पद्धतीने विचार करून भूमिका व्यक्त करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. अण्णाभाऊंच्या साहित्याला कोणतेही लेबल लावता येत नाही, असेही त्या म्हणाल्या.