वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हरियाणातील शेतकरी नेते गुरनाम सिंह चढूनी यांनी संयुक्त किसान मोर्चापासून दूर होण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी नेते योगेंद्र यादव आणि राकेश टिकैत यांच्यावर त्यांनी आरोप केले आहेत. संयुक्त किसान मोर्चाच्या कुठल्याही बैठकीत भाग घेणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. यापूर्वी त्यांना 15 दिवसांसाठी निलंबित करण्यात आले होते.
पंजाबमधील शेतकरी संघटना मागील काही काळादरम्यान आपल्याशी सापत्नपणाने वागत आहेत. पण मोर्चाकडून घेतल्या जाणाऱया निर्णयांचे पालन करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. हरियाणाचे शेतकरी नेते गुरनाम सिंह चढूनी अलिकडच्या काळात पंजाबमध्ये सक्रीय होत आहेत. पंजाबमध्ये शेतकऱयांना निवडणूक लढविण्याचा सल्ला त्यांनी दिला होता, याचमुळे त्यांना 15 दिवसांसाठी निलंबित करण्यात आले होते. त्यानंतरही ते सातत्याने पंजाबचा दौरा करत आहेत. शनिवारीच ते दिल्लीत डेरा बाब नानकमधून शेतकऱयांच्या तुकडीसह पोहोचले होते.
शेतकरी नेत्यांमध्ये वाद
अनेक शेतकरी नेत्यांना विविध संघटनांमधून बाहेर काढण्यात आले आहे. माझ्या नेतृत्वाखाली शेतकऱयांची तुकडी घेऊन पोहोचल्याने हा निर्णय घेण्यात आला. या शेतकऱयांना बैठकीतून धक्के देत बाहेर काढण्यात आल्याचा आरोप गुरनाम सिंह चढूनी यांनी केला आहे. योगेंद्र यादव यांनी उत्तरप्रदेशात निवडणूक लढविताना पोस्टरवर संयुक्त किसान मोर्चाचे समर्थन असल्याचे नमूद केले होते. तर राकेश टिकैत यांनी शेतकऱयांच्या संसदेत भाजप नेत्यांना प्रवेश मिळवून दिला आहे. त्यांच्यावर याप्रकरणी कुठलीच कारवाई करण्यात आली नसल्याचा दावा गुरनाम यांनी केला आहे.
9 महिन्यांपासून निदर्शने
शेतकरी मागील 9 महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर कृषी कायद्यांच्या विरोधात निदर्शने करत आहेत. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात शेतकऱयांनी दिल्लीच्या दिशेने कूच केली असता मार्गात त्यांना रोखण्याचा प्रयत्न झाला होता. पण गुरनाम सिंह चढूनी यांच्या नेतृत्वाखालीच शेतकऱयांनी बॅरिकेड्स तोडून प्रवास केला होता. पण आता हरियाणा आणि पंजाबमधील शेतकऱयांच्या नेत्यांदरम्यान टोकाचे मतभेद दिसून येत आहेत.