सल्लागार समितीत चुरशीच्या लढतीत भारतीय राजनयिकाची लढत
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
संयुक्त राष्ट्रसंघात भारताचा मोठा विजय झाला आहे. भारतीय राजनयिक विदिशा मैत्रा यांची प्रशासकीय आणि बजेटसंबंधी प्रश्नावरील (एसी) संयुक्त राष्ट्रसंघाच्या सल्लागार समितीत सदस्य म्हणून निवड झाली आहे. महासभेचीच ही एक शाखा आहे. आशिया-प्रशांत देशसमुहात संयुक्त राष्ट्रसंघात भारताच्या स्थायी मोहिमेच्या प्रथम सचिव मैत्रा यांनी 126 मते प्राप्त केली आहेत.
सल्लागार समितीतील सदस्यांची नियुक्ती महासभा करते. सदस्यांची निवड व्यापक भौगोलिक प्रतिनिधित्व, वैयक्तिक पात्रता आणि अनुभवाच्या आधारावर होते. आशिया-प्रशांत देशांच्या समुहातून मैत्रा यांच्यासह आणखी एकाची निवड झाली आहे. समुहात इराकचे अली मोहम्मद फइक अल-दबग यांना 64 मते मिळाली ओत. त्यांचा कार्यकाळ 3 वर्षांचा राहणार असून जो 1 जानेवारीपासून सुरू होणार आहे.
भारत संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेत 2 वर्षांसाठी अस्थायी सदस्याच्या स्वरुपात जानेवारीपासून कार्यभार सांभाळण्याची तयारी करत असताना हा विजय झाला आहे. संयुक्त राष्ट्रसंघात भारताचे स्थायी प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ती यांनी एका चित्रफितरुपी संदेशाद्वारे संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदस्य देशांच्या प्रचंड समर्थनाद्वारे मैत्रा यांची एसीएबीक्यूमध्ये निवड झाल्याची माहिती दिली आहे. एसीएबीक्यूच्या कामकाजात एक स्वतंत्र, उद्देशपूर्ण आणि अत्यंत आवश्यक संतुलन मैत्रा निर्माण करतील, असा विश्वास तिरुमूर्ती यांनी व्यक्त केला आहे.
या महत्त्वाच्या निवडणुकीत भारताला समर्थन करणारे आणि भारतीय उमेदवारावर विश्वास दर्शविणाऱया सर्व सदस्यांचे आभार तिरुमूर्ती यांनी मानले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघ बजेटवरील दबाव वाढत असताना एसीएबीक्यूमध्ये भारताचे सदस्यत्व प्रासंगिक आहे. संयुक्त राष्ट्रसंघात व्यावसायिक लेखापरीक्षणाचा अनुभव आणण्याचा भारताचा एक शानदार इतिहास आहे आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या संस्थांमध्ये भारत उत्कृष्ट योगदान देत असल्याचे ते म्हणाले.