नागरिकांची संरक्षण खात्याकडे पुन्हा तक्रार : चर्चा करून रस्ते खुले करण्याची कॅन्टोन्मेंट बोर्डाला सूचना
प्रतिनिधी / बेळगाव
कॅन्टोन्मेंट परिसरातील रस्ते सर्वसामान्य नागरिकांना ये-जा करण्यास बंद केले आहेत. यामुळे सर्व रस्ते खुले करण्याचा आदेश केंद्रीय संरक्षण खात्याने बजावला आहे. मात्र, बेळगाव कॅन्टोन्मेंट परिसरातील रस्ते अद्यापही खुले करण्यात आले नाहीत. याबाबत नागरिकांनी पुन्हा एकदा संरक्षण खात्याकडे तक्रार केली असून कॅन्टोन्मेंट बोर्डच्या बैठकीत चर्चा करून रस्ते खुले करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डच्या बैठकीत याबाबत निर्णय होणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव मिलिटरी प्रशासनाने कॅन्टोन्मेंट परिसरातील बहुतांश रस्ते बंद ठेवले आहेत. परिणामी सर्वसामान्य नागरिकांना ये-जा करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरातील रस्ते सर्वसामान्यांना खुले करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. तरी रस्ते खुले करण्यात आले नव्हते. मात्र सर्व रस्ते खुले करण्याचा आदेश तत्कालीन केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजावला होता. या आदेशाच्या अंमलबजावणीस मिलिटरी प्रशासनाने टाळाटाळ चालविली आहे.
कॅम्प परिसरातील काही रस्ते वाहनधारक आणि नागरिकांना सोयीचे आहेत. पण सुरक्षेचे कारण पुढे करून रस्ते बंद ठेवण्याचा प्रकार चालविला आहे. अरगन तलाव चौकामधून लक्ष्मी टेकडी किंवा गणेशपूरला जाणाऱया नागरिकांना आर. ए. लाईन जवळून जाणारा रस्ता जवळचा आहे. पण हा रस्ता मिलिटरी प्रशासनाने बंद ठेवला आहे. यामुळे वाहनधारकांना शौर्य चौकाला वळसा घालून जावे लागत आहे. नानावाडी येथील अल्बर्ट एक्का रोडदेखील बंद ठेवण्यात आला आहे. परिणामी वाहनधारक आणि स्थानिक रहिवाशांना फेरा मारावा लागत आहे.
यापूर्वी कॅन्टोन्मेंट व लष्करी हद्दीतील रस्ते सर्वसामान्य नागरिकांना बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे रस्त्यांबाबत सर्वसामान्य नागरिक उच्च न्यायालयात गेल्याने रस्ते सर्वसामान्यांना वापरण्यास खुले करण्याचा आदेश न्यायालयाने बजावला होता. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रस्ते खुले करण्याचा आदेश तत्कालीन केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजावला होता. त्यानुसार काही रस्ते खुले करण्यात आले आहेत. पण काही रस्त्यांवर गेट बसवून सर्वसामान्य नागरिकांना ये-जा करण्यास मज्जाव करण्यात येत आहे. त्यामुळे नानावाडी परिसरातील नागरिकांनी पुन्हा एकदा संरक्षण खात्याकडे तक्रार केली आहे.