प्रतिनिधी/ बेळगाव
आमचा आयटीला विरोध नाही, मात्र देसूर येथे आयटीसाठी 140 एकर जागा मंजूर झाली असताना पुन्हा संरक्षण दलाच्या अखत्यारित असलेली 745 एकर जागा राज्य सरकारला हस्तांतरित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तो तातडीने थांबवावा, या मागणीसाठी काही वकील, श्रीनगर येथील रहिवासी आणि आपच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.
बेळगाव येथील पर्यावरण समतोल राखण्यासाठी संरक्षण विभागाकडे असलेली ही जमीन तशीच राहिली पाहिजे. या वनराईमुळे बेळगावला मोठा प्राणवायू मिळतो. केवळ हीच जमीन नाही तर रेसकोर्स, व्हॅक्सिन डेपोमुळे शहराला प्राणवायू मिळत आहे. तेव्हा कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता ही जमीन संरक्षण विभागाकडेच कायम ठेवावी, असे या निवेदनात म्हटले आहे.
देसूर येथे 140 एकर जमीन आयटी पार्कसाठी घेण्यात आली आहे. 40 एकरमध्ये प्लॉटदेखील पाडण्यात आले आहेत. ते काही अद्योजकांना देण्यात आले आहेत. त्या ठिकाणी आयटी पार्क जोमाने सुरू करा. त्याचे बेळगाववासीय स्वागत करतील, आम्ही कोणत्याही परिस्थितीत आयटीला विरोध करणार नाही. मात्र जी जागा संरक्षण विभागाकडे आहे ती राज्य सरकारला हस्तांतरित करणे योग्य नाही. त्यामध्ये भू-माफिया सक्रिय होणार आहेत. तेव्हा कोणत्याही परिस्थितीत ती जमीन देऊ नये, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री बसवराज बोमाई यांनी ही जमीन राज्य सरकारकडे हस्तांतरित करा, अशी मागणी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे केली आहे. मात्र पूर्वी जी जमीन देण्यात आली आहे त्यामध्ये प्रथम आयटी पार्क सुरू करा आणि त्यानंतर आवश्यकता भासल्यास जिल्हय़ातील ज्या ठिकाणी खडकाळ जमीन आहे ती जमीन आयटी पार्कसाठी घ्यावी, असेही या निवेदनात म्हटले आहे. यावेळी निवेदन घेण्यासाठी महसूल अधिकारी एस. एम. परगी आले होते. मात्र जिल्हाधिकाऱयांनाच निवेदन देण्यावरून अधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये काहीवेळ वादावादी झाली.
श्रीनगर येथून मोर्चाला सुरुवात झाली. भर उन्हामध्ये जमिनीच्या संरक्षणासाठी कार्यकर्ते चालत आले होते. कित्तूर चन्नम्मा चौक येथे निदर्शने करून त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आम आदमी पक्षाचे उत्तर कर्नाटक विभागाचे प्रभारी राजीव टोपण्णावर, बांधकाम संघटनेचे जिल्हाध्यक्ष ऍड. एन. आर. लातूर, भ्रष्टाचार निर्मूलन परिवार संघटनेचे अध्यक्ष सुजित मुळगुंद, ऍड. एन. आर. लातूर, ऍड. आर. पी. पाटील, एस. आर. कौजलगी, जी. एल. पाल, एस. बी. दोडमनी, ऍड. एस. आर. कमते, ऍड. रवी शास्त्री, शिवाजी कागणीकर, ऍड. निर्मला पाटील, उमा मठपती, भारती कमते, अखिला पठाण, सीमा इनामदार यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.