व्हीएसआयच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत शरद पवार यांची भीती,
पुणे / प्रतिनिधी
देशाची अन्नधान्याची गरज वाढत असल्याने आपण उसाचे क्षेत्र वाढवू शकत नाही. त्यामुळे उसाचे हेक्टरी उत्पादन वाढविण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी संशोधन क्षेत्रात गुंतवणूक होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा माजी केंद्रीय मंत्री व वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केली. सध्याची साखर उद्योगातील संशोधनातील गुंतवणूक फारच तोकडी आहे. भविष्यात संशोधनात गुंतवणूक वाढवली नाही, तर साखर, इथेनॉल आणि सहवीज याची मागणीही अपुरी पडेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटच्या वतीने आयोजित दुसऱया आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ‘शाश्वतपणा : साखर तत्संबंधित उद्योगात वैविध्यपणा आणि नाविन्यपूर्णता’ या विषयावर ही परिषद आयोजित करण्यात आली होती. कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील, जलसंधारणमंत्री जयंत पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, मृदूसंधारणमंत्री शंकरराव गडाख, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील, पंजाबचे सहकारमंत्री सुखवींदरसिंह रंधावा, युकेच्या आंतराष्ट्रीय साखर संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. जोस ओरिव्ह यांच्यासह 22 देशातील साखर उद्योगातील तज्ञ उपस्थित होते.
पवार म्हणाले, देशातील उसाचे उत्पादन वाढविण्याची गरज आहे. 2025 पर्यंत देशातील साखरेची मागणी 300 ते 330 लाख टनापर्यंत गेलेली असेल. मात्र, देशात सध्या अन्नधान्याची गरज वाढत आहे. उसाखालचे क्षेत्र आपण वाढवू शकत नाही. त्यामुळे हेक्टरी 250 टनांपर्यंत उसाचे उत्पादन वाढविण्याची गरज आहे. सध्या 10.5 टक्क्यांपर्यंत असलेला उतारा 11.5 ते 12 टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. त्यासाठी संशोधन संस्था आणि शास्त्रज्ञांनी पुढाकार घ्यावा. संशोधन संस्थांमध्ये गुंतवणूक होणेही आवश्यक आहे. संशोधन संस्थांमध्ये कुशल तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञ यावर भर देत त्यांना मुक्तपणे संधी द्यायला हवी. वेगवेगळय़ा रोगांचा सामना करू शकतील, अशा उसाच्या नवीन जाती निर्माण करण्याची गरज आहे. तसेच उत्तम दर्जाचे बियाणे विकसित करायला हवे. हवामान, इरिगेशन, खते, मृदुसंधारण, नैसर्गिक शेती, बायोफर्टीलायझर्स यावरही संशोधन व्हावे. नवीन तंत्रज्ञानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संशोधन संस्था, साखर कारखानदार आणि उत्पादक यांच्यातील संबंध सुदृढ व्हावेत, अशी अपेक्षाही पवार यांनी व्यक्त केली.
जोस ओरिव्ह म्हणाले, पेट्रोलियम कंपन्या इथेनॉलचे ब्लेंडिंग वाढविणार आहेत. त्यामुळे साखरेचे अतिरिक्त उत्पादन कमी होण्यास मदत होणार आहे. उसाच्या मळीपासून बनणारे इथेनॉल आता उसाच्या रसापासून बनविण्यावर भर देण्यात येणार आहे. कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीवर भर दिल्यास शाश्वस्त विकास साधणे शक्य होणार आहे. जे कारखाने इथेनॉल निर्मिती करणार नाहीत, त्यांना दंड आकारण्यात येणार आहेत.
साखर निर्यातीत भारत ब्राझीलला मागे टाकेल : डॉ. जोस ओरिव्ह
भारत हा जगातला तिसरा सर्वात मोठा साखर पुरवठादार आहे. थायलंडप्रमाणे भारताचाही निर्यातीचा वाटा वाढत आहे. ब्राझिलची निर्यात स्थिर आहे. रशियाकडून साखरेचे उत्पादन वाढेल, असे सध्याचे चित्र असले, तरीही लवकरच भारत साखर निर्यातीत ब्राझिलला मागे टाकेल.