व्यंकय्या नायडूंचा ‘गोंधळी’ खासदारांना इशारा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
राज्यसभेत यापुढे बेशिस्त आणि गदारोळ खपवून घेतला जाणार नसून कामकाज बंद पाडण्याचा प्रयत्न करणाऱया खासदारांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी दिला आहे. मंगळवारी पुन्हा पेगॅसस आणि कृषी कायद्यांच्या प्रश्नावरुन विरोधकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. दोन्ही सदनांचे कामकाज व्यत्ययानंतर दिवसभरासाठी स्थगित झाले.
काही विरोधी पक्षांनी आणि त्यांच्या खासदारांनी संसदेचे कामकाज पूर्ण अधिवेशनभर बंद पाडण्याचा निर्धार केला आहे, असे वृत्त अनेक माध्यमांनी दिले आहे. हे खरे असेल तर ही बाब चिंताजनक आणि उद्वेगजनक आहे. हे खपवून घेतले जाणार नाही. अशा खासदारांच्या नेत्यांनीं आणि या खासदारांनीदेखील आत्मपरीक्षण करावे. अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई करावी लागेल, असा स्पष्ट संदेश त्यांनी खासदारांना दिला. आपली नाराजी त्यांनी कठोर शब्दांमध्ये सांगितली.
पुन्हा कामकाज स्थगित
मंगळवारीं लोकसभा आणि राज्यसभेत सकाळपासूनच विरोधकांनी गोंधळ सुरू केला. पेगॅसस आणि कृषी कायदे यांच्यावरून कामकाजात सातत्याने व्यत्यय आणला गेला. गोंधळ आणि गदारोळात घोषणाबाजीही करण्यात आली. त्यामुळे लोकसभेचे कामकाज पाचवेळा तर राज्यसभेचे कामकाज चारवेळा स्थगित करण्यात आले. अखेर दुपानंतर कामकाज पूर्ण दिवसासाठी स्थगित करण्यात आले.
काँगेसच्या दोन अटी
संसदेचे कामकाज सुरळीत सुरू करण्यासाठी काँगेसने सरकारसमोर दोन अटी ठेवल्या. संसदेत कथित पेगॅसस हेरगिरी प्रकरणावर पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत चर्चा ही पहिली अट आहे. तर या चर्चेनंतर या प्रकरणाची न्यायालयग्नीन चौकशी सरकारने घोषित करावी, ही दुसरी अट आहे. राज्यसभेतील काँगेसचे मुख्य प्रतोद जयराम रमेश यांनी ही महिती दिली. या अटींवर सर्व विरोधी पक्षांमध्ये एकमत असल्याचा दावा त्यांनी केला.