पाच राज्यातील निवडणुकीची पहिली फेरी एकदाची झाली. पुढील महिन्याच्या 10 तारखेला उत्तर प्रदेश आणि इतर चार राज्यातील निकाल लागणार आहे. कोणता पक्ष किती पाण्यात आहे ते कळणार आहे. पण त्याअगोदरच देशातील राजकारण हळूहळू बदलू लागले आहे याचे संकेत संसदेच्या बजेट सत्रात दिसत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा आणि राज्यसभेतील भाषणात काँग्रेसवर जो तुफानी हल्ला केला त्याने आत्तापर्यंत हतबल दिसणाऱया विरोधी पक्षात एक नवीन जान आणल्याचे विचित्र चित्र दिसू लागले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीला दोन वर्षे उरली असताना मोदींना काँग्रेस हाच प्रमुख विरोधी पक्ष वाटत आहे असेच या भाषणांवरून दिसून येत आहे. जळी-स्थळी-काष्टी-पाषाणी पंतप्रधानांना काँग्रेसचं का दिसावा याबाबत काही काँग्रेसी देखील थोडय़ा विस्मयात आहेत. या भाषणांमध्ये मोदींनी ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांना जवळजवळ अनुल्लेखाने मारणे म्हणजे त्यांच्याकडून राष्ट्रीय स्तरावर आपल्याला फारसा धोका नाही हेच सांगणे होय. बेडकी कितीही फुगली तरी बैल होऊ शकत नाही याची मोदींना जाणीव आहे. गेल्या सात-आठ वर्षात ज्या काँग्रेसचा मोदींनी पालापाचोळा केला तीच परत जोमाने वाढू लागली आहे असाच त्यांचा आता कयास आहे. का ? अथवा राहुल गांधींचे तिसऱयांदा कात्रज करायचे त्यांच्या मनात आहे?
बजेट सत्राचा पहिला भाग आता समाप्त झाला असला तरी तो खरा गाजला विरोधी नेत्यांच्या भाषणांमुळे मग त्या तृणमूलच्या महुआ मोईत्रा असोत अथवा काँग्रेसचे राज्य सभेतील नेते मल्लिकार्जुन खर्गे. पण सर्वात ज्या भाषणाची देश-विदेशात चर्चा झाली ते मात्र राहुल गांधींचे. राहुल यांचे भाषण हे त्यांचे आतापर्यंतचे सर्वाधिक चांगले भाषण होते असे जाणकार मानतात. अठरा वर्षे राजकारणात असणारे व त्यातील गेली सात-आठ वर्षे सत्ताधाऱयांकडून ‘पप्पू’ म्हणून हिणवले गेलेले राहुल एव्हढे टक्के-टोणपे खाऊन आता नेता बनले आहेत याची पावतीच या भाषणाने दिली. सत्ताधारी बाकांवरील अस्वस्थता पदोपदी जाणवत होती. पहिल्या-पहिल्यांदा त्यांना अडथळे आणण्याचे खूप प्रयत्न झाले पण आमच्या नेत्याला बोलू दिले गेले नाही तर राज्यकर्त्यांना देखील बोलून दिले जाणार ही विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांची धमकी कामी आली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गांधींना बोलण्याची एव्हढी सूट कशी काय दिली असा विस्मय काही भाजप सदस्यांच्या तोंडावर दिसून आला.
‘जादू कि झप्पी’ सारखे सवंग प्रकार टाळून राहुल यांनी मुद्यालाच हात घातला. गरिबी, बेकारी, महागाई आणि महामारीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारची ‘प्रभावहीन’ कामगिरी आणि सरकारच्या उद्योगपती मित्रांना मिळू लागलेली खिरापत, तसेच चीन आणि पाकिस्तानला अतिघनिष्ट बनवण्याचे पाप आणि त्याचा देशाच्या संरक्षण व्यवस्थेवर झालेला परिणाम आणि देशाची लोकशाही सुदृढ राहावी यासाठी बनवलेला संस्थात्मक ढांचा पोखरून काढण्याच्या कथित हालचाली हे राहुल यांच्या भाषणातील तीन मुख्य बिंदू होते. मी सरकारवर टीका करण्याच्या उद्देशाने बोलत नसून देश म्हणून आपल्याला पुढे जायचे असेल तर त्याबाबत सरकारला सावध करत आहोत, असा आर्जवी सूर राहुलनी लावला.
सरकारकडून जे उत्तर दिले गेले त्याने मात्र मोदी प्रशासन आणि विरोधी पक्ष यांच्यात संवाद पूर्णपणे नाहीसा झालेला आहे असाच संदेश गेला. हा संवाद फारसा कधी नव्हताच पण तो कोलमडून पडला आहे असेच पंतप्रधान ज्याप्रक्रारे काँग्रेसवर संसदेत उखडले त्यावरून दिसून आले. पंतप्रधानांनी राहुल तसेच इतर विरोधी नेत्यांनी विचारलेल्या ज्वलंत प्रश्नांना बगल देऊन काँग्रेसवर हल्लाबोल करण्याचे काम करून पाच राज्यातील निवडणुकीच्या निमित्ताने प्रचारी भाषण केले असा सूर जाणकारात लागला तो फारसा चुकीचा नव्हता. पाच राज्यातून निवडणुकांची फारशी चांगली वृत्ते मोदींना मिळाली नसल्याने त्यांनी असे केले असेल अशी शक्मयता देखील राजकीय वर्तुळात ऐकू येऊ लागली. उत्तरप्रदेशमध्ये भाजपला पदोपदी लढावे लागत आहे असे चित्र असताना कर्नाटकात हिजाबवरून वाद सुरु झाला आहे हा योगायोग नाही असे विरोधी नेते बोलत आहेत. ध्रुवीकरणाचे राजकारण करण्यासाठी आग दुसरीकडे पेटवली तरी चालू शकते. ‘कहींपे निगाहे, कहींपे निशाना’ ही रणनीती जुनीच आहे. योगी आदित्यनाथ यांनी निवडणूक ‘80 विरुद्ध 20’ अशी आहे असे घोषित करून भाजपचा डाव उघड केला आहे.
पंजाबमधील खेळी
काँग्रेसने पंजाबमध्ये वापरलेल्या दलित कार्डाने त्याच्या विरोधकांना स्तिमित केले आहे. चरणजित सिंग चन्नी यांना मुख्यमंत्री बनवण्याची खेळी म्हणजे राहुल गांधी हे नेता या नात्याने परीपक्व बनत आहेत याचीच निशाणी होय असे राजकीय निरीक्षक मानतात. आता त्यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित करून राहुल यांनी संपूर्ण देशातील तळागाळातील लोकांची सदिच्छा मिळवली आहे. काँग्रेसच्या दलित कार्डाला भाजप कसा छेद देणार ते पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर दिसणार आहे. इंदिरा गांधींनी दलितांचा नेता म्हणून जगजीवन राम यांना आणि राजीव गांधी यांनी बुटा सिंग यांना पुढे आणले तद्वतच राहुल हे चन्नी यांना वर आणत आहेत. एकीकडे बसपच्या मायावतींच्या प्रभावाला उतार लागला आहे असे दिसत असताना दलितांना परत आपल्याकडे ओढण्याचा खेळ काँग्रेसने अलगदपणे सुरु केला आहे. आम आदमी पक्ष हा पंजाबमध्ये काँग्रेसला जोरदार टक्कर देत असताना त्यांचे नेते अरविंद केजरीवाल यांनी मोदींवर टीका करण्याचे सोडून दिलेले दिसत आहे. एका राष्ट्रीय वर्तमानपत्राने केलेल्या पाहणीत असे आढळून आले आहे कि ‘आप’ चार राज्यात निवडणूक लढवत असले तरी तेथील पहिल्या 38 सभांमध्ये ‘मोदी’ या नावाचा उच्चारदेखील केजरीवाल यांनी केलेला नाही. आप हा भाजपची ‘बी’ टीम आहे असा काँग्रेसचा दावा राहिला आहे.
गंमतीची गोष्ट म्हणजे पंतप्रधानांच्या काँग्रेसवरील जबर हल्ल्याने विरोधी पक्षातील राहुल यांचे नेतृत्व मजबूत झाले आहे. प्रादेशिक पक्ष आणि त्यांचे नेते मग त्या तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी असोत अथवा आपचे केजरीवाल वा तेलंगणा राष्ट्र समितीचे के चंद्रशेखर राव हे राष्ट्रीय राजकारणात मोदींच्या खिजगणतीत नाहीत हाच संदेश गेला आहे. काँग्रेसअंतर्गत जी-23 हा असंतुष्ट नेत्यांचा गट केवळ निष्प्रभ झालेला आहे असे नाही तर एक गट म्हणून विस्कळीत झालेला आहे, जवळजवळ विसर्जित झालेला आहे. या गटाचे एक सदस्य संजय झा तर अलीकडे समाज माध्यमांवर राहुल यांचे भाट बनलेले दिसत आहेत. पहिल्या फेरीच्या मतदानापूर्वी योगी आदित्यनाथ यांनी मतदारांना इशारा दिला आहे कि जर भाजप हारली तर उत्तर प्रदेशचा काश्मीर, बंगाल आणि केरळ होईल. पंतप्रधानांनी एका धार्जिण्या पत्रकाराला दिलेली मुलाखत मतदानाच्या अगोदर एक दिवस सर्व वृत्तवाहिन्यांवर प्रसारित करून एक नवा वाद छेडला आहे. वातावरणात एक अस्वस्थ शांतता आहे. ‘शोले’ मधील ए के हंगल जणू विचारत आहे ‘इतना सन्नाटा क्मयूँ है भाई ?’
सुनील गाताडे