नवी दिल्ली / वृत्तसंस्था
संसदेचे हिंवाळी अधिवेशनही कामकाजाच्या दृष्टीने वाया जाणार असे चिन्ह दिसू लागले आहे. अधिवेशनाच्या चौथ्या दिवशीही गुरुवारी लोकसभा आणि राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. विरोधी पक्षांच्या सदस्यांनी कामकाजात वारंवार व्यत्यय आणला. 12 खासदारांच्या निलंबनावरुन वाद सुरु आहे.
गुरुवारी काँगेस नेते राहुल गांधी यांनीही लोकसभेत निषेधात्मक कृतींमध्ये भाग घेतला. विरोधी पक्षांच्या सदस्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. निलंबन मागे घ्या, अशी त्यांची मागणी होती. तसे फलकही त्यांनी हाती धरले होते. तथापि, या ‘गोंधळी’ खासदारांनी क्षमायाचना केल्याशिवाय त्यांचे निलंबन रद्द केले जाणार नाही, अशी ठाम भूमिका उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी घेतली आहे. निलंबित खासदारांनी संसदेतील महत्मा गांधींच्या पुतळय़ाजवळ उभे राहून निलंबन रद्द करण्याची मागणी करत निदर्शने केली.
विरोधकांचा सभात्याग
गुरुवारी दुपारी काँगेस सह विरोधी पक्षांच्या अनेक सदस्यांनी राज्यसभेतून सभात्याग केला. निलंबच्या कारवाईचा विरोध करण्यासाठी सभात्याग केल्याचे सांगण्यात आले. याशिवाय महागाई आणि शेतकऱयांचे प्रश्न या विषयांसाठीही हा सभात्याग होता असे नंतर सांगण्यात आले. काँगेस, डावे पक्ष, तृणमूल काँगेस, तेलंगणा राष्ट्र समिती आणि द्रमुक तसेच काही छोटे पक्ष यांच्या सदस्यांनी सभात्यागात भाग घेतला. विरोधी पक्षांचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी महागाई आणि शेतकऱयांच्या प्रश्नांवर चर्चा केली जावी अशी मागणी केली. लोकसभेत गुरुवारी प्रश्नोत्तरांचा तास शांततेत पार पडला. मात्र, नंतर विरोधी खासदारांनी गोंधळ घालण्यास प्रारंभ केला. तेलंगणा राष्ट्र समितीच्या खासदारांनी शेतकऱयांच्या समस्यांवर घोषणा दिल्या. तसेच फलक फडकाविले. नंतर फलकांचे तुकडे करुन ते सभाध्यक्षांच्या आसनाकडे भिरकावले. यावेळी कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर सभागृहात उपस्थित होते. वारंवार व्यत्ययामुळे कामकाज स्थगित झाले.