नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
केंद्र सरकारनं लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांवरून दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच आहे. आज शिरोमणी अकाली दलच्या खासदार आणि माजी मंत्री हरसिमरत कौर बादल आणि काँग्रेस खासदार रवनीत बिट्टू यांच्यात संसद भवन परिसरातच कृषी कायद्यांवरून शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. दोन्ही नेत्यांच्या शाब्दिक चकमकीचा व्हिडीओ समोर आला आहे.
हरसिमरत कौर हातात फलक घेऊन संसदेबाहेर कृषी कायद्यांचा विरोध करत होत्या. यावेळी रवनीतसिंग बिट्टू तिथे आले आणि कौर यांनी भाजपासोबत सत्तेत राहून कायदे पारित करवून घेतल्याचा आरोप केला. त्यानंतर हरसिमरत कौरदेखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
हरसिमरत यांची निदर्शने म्हणजे ढोंग असल्याचं रवनीत बिट्टू यांनी यावेळी म्हटलं. हरसिमरत कौर यांनी स्वतः मंत्री असताना या कायद्यांना विरोध केला नाही. त्यांनी स्वतः या विधेयकांना पारित केलं. जेव्हा शेतकऱ्यांमध्ये कायद्यांविरोधात रोष वाढत गेला तेव्हा हरसिमरत यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. जेव्हा विधेयक पारित होत होतं तेव्हा तुम्ही विरोध का नाही केला? आता केवळ दाखवण्यासाठी तुम्ही कृषी कायद्यांचा विरोध करत आहात, असं काँग्रेस खासदार रवनीत बिट्टू यांनी म्हटलं.
रवनीत बिट्टू यांच्या आरोपांना हरसिमरत कौर बादल यांनीही तेवढंच आक्रमक प्रत्युत्तर दिलं. ”विधेयक पारित होत असताना राहुल गांधी कुठे होते असं यांना विचारा. ते संसद सोडून गेले होते आणि काँग्रेसने वॉकआऊट केल्यामुळेच ही विधेयके पारित होण्याला मदत झाली.” असं प्रत्युत्तर हरसिमरत कौर यांनी दिलं.