राज्यसभा दुपारीच तहकूब : लोकसभेत नव्या शिक्षण धोरणासह विधेयकांवर चर्चा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
14 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर अशा 18 दिवसांसाठी आयोजित करण्यात आलेल्या पावसाळी अधिवेशनाचे सूप बुधवारी दहाव्या दिवशीच वाजले. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हे अधिवेशन लवकर संपविण्यात आले. महत्त्वाच्या विधेयकांना मंजुरी मिळाल्यानंतर राज्यसभेचे कामकाज दुपारीच पुढील अधिवेशनापपर्यंत तहकूब करण्यात आले. तर, लोकसभेचे कामकाज रात्री साडेआठ वाजेपर्यंत सुरू ठेवून महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली व विधेयकांना मंजुरीही देण्यात आली. दरम्यान, राज्यसभेतील विरोधी पक्षांनी आपला आक्रमक पवित्रा सलग तिसऱया दिवशीही कायम ठेवल्याचे दिसून येत होते. त्यांनी राज्यसभा सभापती आणि राष्ट्रपती यांच्या वेगवेगळय़ा भेटी घेत आपली नाराजी व्यक्त केली.