दहा राज्यात सतर्कता – ‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्यामुळे केंद्र सरकारने विशेष मोहीम सुरू केली आहे. गेल्या दोन दिवसात करण्यात आलेल्या नियोजनानुसार आता पुन्हा देशातील विविध राज्यांमध्ये केंद्रीय स्तरावरील आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत. महाराष्ट्र, कर्नाटकसह केरळ, पंजाब, छत्तीसगड, मध्यप्रदेश, गुजरात, तमिळनाडू, पश्चिम बंगाल आणि जम्मू-काश्मीर या राज्यांमध्ये बुधवारी पथके रवाना झाली आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. काही राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा मोठा आहे. महाराष्ट्रासोबतच आणखी काही राज्यांमध्येही कोरोनाचा कहर वाढत असल्यामुळे केंद्र सरकार सतर्क झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेल्या राज्यांमध्ये केंद्राने उच्चस्तरीय पथके पाठवली आहेत. ही पथके राज्यांना कोरोना संकट रोखण्यास मदत करणार आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील सहसचिव पदावरील अधिकारी या पथकांचे नेतृत्व करणार आहेत.
पत्राद्वारेही राज्यांना सूचना
केंद्रीय आरोग्य सचिवांनी सात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्रदेखील लिहिले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना केंद्राकडून महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड, गुजरात, पंजाब, मध्य प्रदेश आणि जम्मू-काश्मीरला करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे आदेशदेखील केंद्रीय आरोग्य सचिवांनी दिले आहेत.
देशात 13 हजार 742 नवे रुग्ण
देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 13 हजार 742 नवे रुग्ण आढळून आले. यापैकी 6 हजार 218 रुग्ण एकटय़ा महाराष्ट्रात आहेत. देशात आतापर्यंत 1 कोटी 10 लाख 30 हजार 176 इतके बाधित सापडले असून 1 कोटी 7 लाख 26 हजार 702 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. तसेच 1 लाख 56 हजार 567 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून अजूनही देशात 1 लाख 46 हजार 907 इतके सक्रिय रुग्ण आहेत. बुधवारी सकाळी 8 वाजेपर्यंतच्या अखेरच्या चोवीस तासात देशात 104 जणांचा मृत्यू झाला असून मृत्यूदर 1.42 टक्क्यांपर्यंत खाली घसरला आहे. तसेच बरे होणाऱयांचे प्रमाणही 97.25 टक्के झाले आहे. आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 21 कोटी 30 लाख 36 हजार 275 चाचण्या करण्यात आल्या असून मंगळवारी एका दिवसात 1 लाख 5 हजार 844 नमुन्यांच्या कोरोना चाचण्या पूर्ण झाल्या.