प्रतिनिधी /फोंडा
म्हादई नदीला आलेल्या महापुरात उसगांव गांजे पंचायत क्षेत्रातील गांजे, तिराळ, ताकवाडा, कातरवाडा यासह अन्य भागांतील बहुतेक घरे पाण्याखाली गेल्याने घरातील एकही वस्तू जाग्यावर राहिलेली नाही. घरातील महत्त्वाची कागदपत्रेही पाण्यात वाहून किंवा भिजून खराब झालेली आहेत. अशा परिस्थितीत नुकसान भरपाईसाठी अर्ज करायचा झाल्यास कागदपत्रे आणायची कुठून हा प्रश्न पूरग्रस्तांना पडलेला आहे.
घरपट्टीची पावती किंवा घरासंबंधी एखादा दाखला दिल्याशिवाय तळाठी नुकसान भरपाईचा अर्ज दाखल करुन घेत नाही. दुसरीकडे कागदपत्रेही शोधून सापडत नाहीत अशा विचित्र परिस्थितीत अनेक पूरग्रस्त सापडले आहेत. या आपत्तीतून बरीच कुटुंबे अजूनही पुरती सावरलेली नाही. त्यांच्या अडचणी अजून न वाढविता, इतर पर्यायी सोय उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी मदतकार्यात गुंतलेल्या समाजकार्यकर्त्यांनी केली आहे.
शुक्रवारी पहाटे आलेल्या या पुरात उसगांव गांजे भागातील बरीच घरे छप्परापर्यंत बुडाली होती. त्यात घरातील सामानसुमानासह अनेक मौल्यवान वस्तू पाण्यात वाहून गेल्या. ज्या शिल्लक राहिल्या त्या चिखगाळात सापडल्या. त्यात घरातील महत्त्वाची कागदपत्रे व अन्य ओळखपत्रांचाही समावेश आहे. काही कुटुंबे अजूनही इतर ठिकाणी आश्रयाला आहे. अशा लोकांना स्थानिक पंचसदस्यांच्यामार्फत ओळख दाखवून नुकसान भरपाईचे अर्ज भरून घेण्याची मागणी केली जात आहे.
वीज व पाण्याची बिले माफ करावीत
या महापुरात बहुतेक कुटुंबाना मोठा आर्थिक फटका बसल्याने आपले संसार नव्याने उभारताना पैसे आणायचे कुठून असा प्रश्न पडलेला आहे. सरकारने पूरग्रस्तांना थोडासा दिलासा देण्यासाठी दोन महिन्यांची वीज व पाण्याची बिले माफ करण्याची मागणीही सामाजिक संस्थाकडून होऊ लागलेली आहे.