अध्याय तेविसावा
माणसाला सुखदुःखांच्या व अन्य विकारांच्या जाणिवा मनामुळे होत असतात. जे मनावर विजय मिळवतात त्यांना आत्मबोधाच्या योगाने सुखदुःखांचे भोवरे न लागताच निघून जातात. मनोजय हा त्रिभुवनात धन्य होय. ज्याने आपल्या मनाला जिंकले, त्याने ईश्वराला विकत घेतल्यासारखे होते. त्यामुळे ईश्वर त्रिभुवनात बलवान होतो. दोघांच्याही अंतःकरणांत आत्मैक्मयामुळे तो म्हणजे मी किंवा मी म्हणजे तो असा विचार असतो. मनोजयाने एवढा अधिकार प्राप्त होतो. आत्मस्वरूपात सुखदुःख नाही पण ते देहामध्ये प्रत्यक्ष दिसते. ह्याच्या योगाने नित्य सुख प्राप्त होते. हाच आत्मविवेक दुस्तर संसारातून तारणारा आहे. आत्मस्वरूपाच्या अनुभवाने त्यांना प्रारब्धाच्या गतीने प्राणिमात्रांनी अनेक प्रकारची सुखदुःखे दिली तरीही त्यांची आत्मस्वरूपस्थिती ढळत नाही. त्यांना प्राणिमात्राच्या ठिकाणी द्वेष उत्पन्न होत नाही व त्यांच्या मनात मुळीच राग येत नाही. त्रिभुवनामध्ये मीच एक भरलेला आहे असे समजून ते निश्चितपणे द्वंद्वरहित असतात. सर्वत्र आत्मस्वरूपच असल्याने तो सर्वांबरोबर आप्तपणानेच वागत असतो. त्याला समविषमभाव व भेद हे असत नाहीत. तो कोणाचे भयही मानत नाही व कोणाचा खेदही करत नाही. तो सदोदित सुखात आणि आत्मानंदातच निमग्न असतो. निंदा किंवा उपद्रव झाला तरी उद्विग्न न होता सर्व सहन करून सुख प्राप्त झाल्याप्रमाणे राहावयाचे, हेच सिद्धाचे मुख्य लक्षण होय आणि साधकांना साधनही तेच होय. प्राचीन महर्षींनी यापूर्वी परमात्मनि÷sचा आश्रय घेतला आहे, भेदभावापासून होणारी सुखदुःखे सहन करणे हेच सिद्धाचे मुख्य लक्षण आहे. त्यासाठी सात्विक धैर्य बाळगण्याची गरज आहे. याच्याच योगाने मनोजय होतो. हेच परमार्थाचे श्रे÷ साधन होय. मोठमोठय़ा ऋषींची हीच आत्मनि÷ा होय. विष्णूचे मुख्य भजन ते हेच होय. याच्या योगानेच आत्मनि÷ा साध्य होते.
संसारसमुद्र तरून जावयाला फार कठीण आहे, तरी तो तरून जाण्याला आत्मविवेक हे उत्तम तारू आहे. त्यातील सद्गुरु हा सुकाणूवाला मायेच्या पैलतीराला पोचवितो. हा आत्मविवेक हाती कसा येईल? ही देखील चिंता करावयास नको. आत्मभावनेने एकाग्रता करून भगवंताला शरण जावे. लौकिकाची लाज सोडून व अभिमानाचे ओझे फेकून देऊन भगवंताला शरण जावे, तेंव्हा आत्मविवेक प्राप्त होतो.
ज्याप्रमाणे तान्हे मूल आईला सर्वतोपरी अनन्यभावाने शरण जाते, तशा अनन्यभावाने रात्रंदिवस श्रीहरीला शरण जावे. हरीला शरण गेले असता जन्ममरण तोंडसुद्धा दाखवीत नाही. हरीच आपल्या भक्तांचे रक्षण करणारा असल्यामुळे तेथे कोणते द्वंद्व पीडा देऊ शकेल? श्रीहरी हाच पूर्णपणे मोक्षदाता आहे. त्याला शरण कसे जावे? तो अनंतस्वरूप असूनही स्वतः निर्गुण आहे. तेथे कोण जाणार? परंतु हरीचे स्वरूप अत्यंत निर्गुण असले तरी त्याच्या सगुण मूर्तीचे चिंतन केले असता ती सर्व मूर्ती जरी ध्यानात ठसली, तरी देखील द्वंद्वापासून होणारी सर्व दुःखे लयास जातात म्हणून समजावे. श्रीहरीची संपूर्ण मूर्ती ध्यानात न भरेल, तर श्रीहरीचे पायच नीट ध्यानात धरावेत, म्हणजे तेणेकरून जन्ममरण उठून पळून जाते आणि भेदाभेदही आपल्याच भयाने स्वतः पळून जातात.
जर ते पायही ध्यानात नीट धरवले नाहीत, तर नास्ममरण करावे. ज्याच्या नामस्मरणाने यम आणि काळ हे पूर्णपणे थरथर कापतात. जेथे हरिनामाचा नित्य घोष चालतो, तेथे मरणालाच मरण आले असे समजा. जन्माचे तोंड काळे ठिक्कर होते आणि ते लाजून पार पळून जाते. रामनामाच्या गजरापुढे भेदाभेदाचे दुःख ते बिचारे किती? नाममहात्म्याची गर्जना करीत असता संसाराचे सर्व भयच उडून जाते. ज्याची वाणी निरंतर नामाची गर्जना करीत असते, त्याच्या शब्दांमध्येच श्रीहरीची वस्ती असते. त्याच्या घरी ऋद्धी सिद्धी पाणी भरतात. मुक्ति त्याची दासी होऊन राहते.