नीनाताई काकतकर यांचे प्रतिपादन : महिला आघाडीतर्फे तिळगूळ समारंभ
प्रतिनिधी / बेळगाव
आजच्या आधुनिक युगात हळदीकुंकू कार्यक्रमाचे स्वरूप बदलले आहे. स्पर्धा, उपक्रमाच्या माध्यमांचे आयोजन केले जात आहे. स्त्रियांनी एकत्र यावे हा कार्यक्रमाचा मूळ उद्देश व गाभा अबाधित आहे. आजची स्त्री बदलली असली तरी संसार आणि नाती जपण्यात ती आघाडीवर आहे. हे सर्व करत असताना स्त्रियांनी आपले आरोग्य जपावे, असे मत मराठा बँकेच्या व्हा. चेअरपर्सन नीनाताई काकतकर यांनी व्यक्त केले. म. ए. समितीच्या महिला आघाडीतर्फे आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.
सोमवारी मराठा बँकेच्या सभागृहात महिला आघाडीतर्फे तिळगूळ समारंभ पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून नीनाताई काकतकर उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी रेणू किल्लेकर होत्या. व्यासपीठावर महिला आघाडीच्या उपाध्यक्षा सुधा भातकांडे, सेक्रेटरी सरिता पाटील तसेच सुहाना पनीर मसाला पाककला स्पर्धेच्या परीक्षक तेजस्विनी मोदगेकर, केक स्पर्धेच्या परीक्षक रिना मुचंडीकर उपस्थित होत्या. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिवपुतळय़ाचे पूजन व जिजामाता प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
नीनाताई काकतकर पुढे म्हणाल्या, आज स्त्रिया पुरुषांच्या बरोबरच खंबीरपणे उभ्या आहेत. भारतीय संस्कृती कुटुंब संस्थेवर आधारलेली असून संस्कारक्षम पिढी घडविण्याचे कार्य स्त्री करत आहे, असे नमूद केले. तसेच मासिक पाळी याविषयी महिलांशी संवाद साधला.
प्रारंभी प्रास्ताविक करताना रेणू किल्लेकर यांनी महिला आघाडीच्या कार्याची माहिती दिली. तसेच सीमालढय़ासाठी महिला आघाडी नेहमी प्रयत्नशील असल्याचे नमूद केले. यानंतर मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
केक स्पर्धेतील विजेत्या तसेच सुहाना पनीर मसाला स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. सुहाना पनीर मसाला यांचे यासाठी सहकार्य लाभले. यानंतर महिलांसाठी होम मिनिस्टर ही स्पर्धा पार पडली. प्रारंभी अर्चना देसाई आणि गुप यांनी ईशस्तवन सादर केले. स्वागतगीत प्रभावती सांबरेकर आणि ग्रुपने सादर केले. पाहुण्यांचा परिचय कांचन भातकांडे, मंजुश्री खोत व अर्चना कांबळे यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रिया कुडची यांनी केले. आभार सरिता पाटील यांनी मानले. यावेळी महिलांना हळदीकुंकू व वाण देण्यात आले.
शिवसेनेच्या हुतात्म्यांना अभिवादन
यावेळी महिला आघाडीतर्फे मुंबई येथे झालेल्या आंदोलनात हुतात्मा झालेल्या शिवसेनेच्या 67 हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. तसेच सीमाप्रश्नासाठी महिला आघाडी कटिबद्ध असल्याचे रेणू किल्लेकर यांनी सांगितले.