वळवई येथील निवासी कीर्तन प्रशिक्षण शिबिराचा समारोप सोहळा
वार्ताहर/ सावईवेरे
आजची पिढीला संस्कारक्षम बनण्यासाठी कीर्तनासारखे दुसरे माध्यम नाही. मुलांची माता ही पहिली गुरू असते. त्यानंतर पिता व शिक्षक असतात. पुस्तकी ज्ञानाबरोबरच बाहेरील जगाचे शिक्षण देण्याचे काम कीर्तनातून कीर्तनकार करीत असतात म्हणून कीर्तनाला सामाजिक आश्रयाबरोबरच राजाश्रय मिळणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन दै. तरूण भारतचे गोवा आवृत्ती संपादक सागर जावडेकर यांनी केले.
वळवई येथील तारी सोसायटीच्या सभागृहात श्री गजांतलक्ष्मी संस्थान व तारी सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने गोमंतक संत मंडळ संचलित कीर्तन विद्यालय यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या चार दिवशीय निवासी कीर्तन प्रशिक्षण शिबिराच्या समारोप सोहळय़ाप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ह.भ.प. सुहासबुवा वझे, देवस्थानचे अध्यक्ष मधुसुदन तारी, तारी सोसायटीचे अध्यक्ष रत्नाकर तारी, नाटय़दिग्दर्शक विनायक तारी, डॉ. राजेश किनरे, सागर भट, दामोदर कामत आदी उपस्थित होते.
विश्वची माझे घर, धर्म परिषेदेत बंधू भगिनीनो ….ही आमची संस्कृती
पुढे बोलताना सागर जावडेकर म्हणाले की हिंदु धर्म हा जगात जसा आहे तशीच भारतीय संस्कृती ही जगात श्रेष्ठ आहे. हे ‘विश्वची माझे घर’ मानण्याची भारतीय संस्कृती असून स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथे झालेल्या धर्म परिषदेत विचार मांडताना सुरवातीला ‘बंधू भगिनीनो’ असे संबोधित केल्यानंतर मिळविलेली जागतिक प्रशंसा ही आपली संस्कृती सांगते. आपल्या संस्कृतीवर अनेक आघात झाले. तरीही संतांनी आपली संस्कृती टिकवून ठेवली. ती पुढे नेण्यासाठी ह.भ.प. सुहासबुवा वझे सारखी संस्कृती प्रेमी माणसे आज ती धुरा पुढे नेण्याचे काम करीत आहेत. स्वातंत्र्यलढय़ात संतांनी कीर्तनाच्या माध्यमातून जे कार्य केले ते सुत्य असे आहे. आजच्या पिढीतून नवनवे श्रेष्ठ असे कीर्तनकार व्हावेत अशी इच्छा त्यांनी शेवटी व्यक्त केली. यावेळी रत्नाकर तारी यांनीही विचार मांडत तारी सोसायटीच्या कार्याची माहिती दिली.
प्रास्ताविक सुहासबुवा वझे यांनी केले. त्यानी वळवई गावची कला जोपासण्याचे कार्याचा उल्लेख केला. कला जोपासण्यासाठी वळवई गावाला ईश्वराचे वरदान असल्याचे हे 27 वे कीर्तन निवासी शिबिर सर्वाच्या सहकार्याने यशस्वी झाल्याचे ते म्हणाले. देश, धर्म, संस्कृती समाज याचा विसर पडलेल्या माणसांना भक्तीची अंत्यत गरज आहे. कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रधर्म व हिंदु धर्म याची जोपासना करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
दामोदर कामत यांनी स्वागत केले. यावेळी कीर्तनकार सुहासबुवा वझे यांचा श्रीफळ, शाल, स्मृतिचिन्ह देऊन सागर जावडेकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शिबिरात सहभागी झालेल्या चाळीसही विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रांचे वाटप मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गोविंद भगत यांनी केले. दामोदर कामत यांनी आभार मानले.