आजवर 40 जण संस्थात्मक विलगीकरण कक्षात
वार्ताहर/ राजापूर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजापूर तालुका सेफ झोनमध्ये असला तरी प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर आजवर 40 जणांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर होम क्वॉरंटाईनची संख्या 313 इतकी आहे. दरम्यान बाहेरून आलेल्या व्यक्तींचे संस्थात्मक विलगीकरण 5 दिवसांऐवजी आता 14 दिवस करण्यात आल्याने राजापूर आरोग्य विभागाकडून शहरातील गुजराळी येथील श्री मंगल कार्यालय संस्थात्मक विलगीकरण कक्षासाठी आरक्षित करण्यात आले आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी राजापूर तालुका प्रशासनाने प्रारंभीपासूनच विशेष परिश्रम घेतले आहेत. शिमगोत्सव व त्यानंतरच्या काळात तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात आलेल्यांना तत्काळ सर्वेक्षण करून क्वॉरंटाईन करणे, त्यांची नियमित तपासणी करणे यांसारख्या बाबींवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले होते. राजापूर तालुक्यात प्रशासनाच्यावतीने संस्थात्मक विलगीकरणासाठी राजापूर शहरातील वरचीपेठ शाळा व आडिवरे येथील भक्तनिवास ही 2 केंद्रे आरक्षित करण्यात आली होती. 5 दिवसांचा संस्थात्मक विलगीकरणाचा कालावधीत असल्याने या दोन्ही ठिकाणी येणाऱयांना विलगीकरण करून पुढील 5 दिवसात सोडले जात होते. मुंबई, पुणे व अन्य शहरांतून आलेल्यांना या संस्थात्मक विलगीकरण कक्षात दाखल केले जात आहे. मात्र आता संस्थात्मक विलगीकरण कक्षात क्वॉरंटाईन करण्याचा कालावधी हा 14 दिवसांचा करण्यात आला आहे. त्यामुळे जर का बाहेरून येणाऱयांची संख्या वाढली तर अडचण निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून शहरातील गुजराळी येथील श्री मंगल कार्यालय संस्थात्मक विलगीकरण कक्षासाठी आरक्षित करण्यात आले आहे. आता येथे एक, आडिवरे येथे 27 तर राजापुरात 12 असे एकूण 40 जण संस्थात्मक विलगीकरण कक्षात आहेत. तर अद्यापही 313 जण होम क्वारंटाईन आहेत. त्यांचा 28 दिवसांचा कालावधी संपल्यानंतर ते होम क्वॉरंटाईनमधून मुक्त होणार आहेत. परदेशातून आलेल्या 57 पैकी 56 जणांचा 28 दिवसांचा क्वॉरंटाईनचा कालावधी संपल्याने ते क्वॉरंटाईनमधून मुक्त झाल्याची माहिती आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.