श्रीमंत विजयसिंहराजे यांच्या हस्ते प्रतिष्ठापना
प्रतिनिधी/सांगली
सांगलीचे आराध्य दैवत श्री गजानन आणि श्री गणपती पंचायतन संस्थानच्या गणेशाचे परंपरेनुसार स्थापना करण्यात आली. सांगली संस्थानचे प्रमुख श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन आणि श्रीराजलक्ष्मीराजे पटवर्धन यांनी संस्थानच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठापना केली आणि अत्यंत उत्साहात या उत्सवाला प्रारंभ झाला. सलग दुसऱयावर्षी संस्थानचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा होत आहे.
शुक्रवारी सकाळी दहा वाजता गणेशोत्सवास प्रारंभ झाला. श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन, श्रीराजलक्ष्मीराजे पटवर्धन, पौर्णिमा पटवर्धन यांच्यासह राजपरिवारातील सदस्यांच्या उपस्थित दरबार हॉल येथे प्रतिष्ठापना करण्यात आली. सलग दुसऱयावर्षी मिरवणूक, वाजंत्री अथवा अन्य लवाजमाही नव्हता. पूर्णपणे सामाजिक सुरक्षिततेचे पालन करून स्थापना करण्यात आली. दरबार हॉलमध्ये संस्थानच्या नियमानुसार या प्राणप्रतिष्ठपना करण्यात आली. यावेळी फक्त राजपरिवरातील सदस्य तसेच संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.
कोरोनामुळे हा उत्सव फक्त घरगुती
कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नाही. या उत्सवामुळे गर्दी होण्याची शक्यता आहे. या शक्यतेचा विचार करून हा उत्सव राजपरिवाराच्या उपस्थितीत फक्त घरगुती स्वरूपात केला जाणार असल्याचे यापूर्वीच संस्थानचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार या उत्सवाला प्रारंभ झाला आहे.
विसर्जनही साधेपणानेच
मंगळवार 14 रोजी दुपारी चार वाजता या गणपतीचे विसर्जनही राजपरिवाराच्या सदस्यांच्या उपस्थित अत्यंत साधेपणाने होणार आहे. विसर्जनप्रसंगी यावेळी कोणताही मिरवणूक तसेच रथयात्रा पालखी असे काहीही असणार नाही. भाविकांनी याठिकाणी गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पाच दिवस कोणतेही कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत. दर्शन सुविधा बंद ठेवण्यात आली आहे. दरबार हॉल, गणपती मंदिर व सरकारी घाट येथे विसर्जनप्रसंगी गर्दी करू नये, असे आवाहन जयदीप अभ्यंकर यांनी केले आहे.