सेन्सेक्स 814 अंकांच्या वाढीसह बंद, आयटी कंपन्या नफ्यात
प्रतिनिधी/ मुंबई
आठवडय़ाच्या पहिल्या आणि महिन्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजाराने तेजीसह सांगता केली आहे. दोन्ही निर्देशांक तेजीसह बंद झाले असून आयटी कंपन्यांच्या समभागांनी मजबूत कामगिरी दर्शवली आहे.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 814 अंकांच्या वाढीसह 58,014 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 231 अंकांच्या वाढीसह 17,339 अंकांवर बंद झाला. दरम्यान गुंतवणूकदारांनी सोमवारी बाजारात 3 लाख कोटी रुपयांहून अधिकची कमाई केली आहे. संसदेत आर्थिक सर्व्हेक्षणाची सकारात्मक बाब स्पष्ट करण्यात आल्यानंतर बाजारात तेजीचा माहोल दिसून आला. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स 700 अंकांच्या वाढीसह कार्यरत होता, तर दुपारी 1 हजार अंकांची वाढही दर्शवली होती. लिस्टेड कंपन्यांचे बाजार भांडवल 264.45 लाख कोटीवर पोहचले आहे. शुक्रवारी ते 261.23 लाख कोटी होते. सकाळी सेन्सेक्स 645 अंकांच्या तेजीसह 57,845 अंकांवर खुला झाला होता. 30 समभागांपैकी 27 तेजीसह बंद झाले तर 3 अर्थात घसरणीसह बंद झाले. यात टेक महिंद्रा, विप्रो आणि इन्फोसिस यांचे समभाग सर्वाधिक प्रत्येकी 3 टक्के वाढलेले दिसले. अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फिनसर्व्ह, डॉ. रेड्डिज लॅब्ज, एशियन पेंटस्, एसबीआय, टीसीएस आणि नेस्ले यांचे समभाग तेजीसोबत बंद झालेले पहायला मिळाले. याखेरीज मारुती सुझुकी, टाटा स्टील, रिलायन्स इंडस्ट्रिज, पॉवरग्रिड कॉर्प, सन फार्मा, ऍक्सिस बँक आणि कोटक बँक यांचे समभाग नफ्यात होते. तर हिंदुस्थान युनिलिव्हर, इंडसइंड बँक यांचे समभाग घसरण नोंदवत होते.
दुसरीकडे युरोपिय बाजारातही सकारात्मक वातावरण होते. आशियाई बाजारातही तेजी दिसली होती. याचा परिणाम भारतीय बाजारावर सकारात्मक दिसून आला. हाँगकाँगचा हँगसेंग आणि जपानचा निक्की नफ्यात होता. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलात 0.86 टक्के इतकी वाढ दिसली. शुक्रवारी 5,045.34 कोटी रुपयांचे समभाग विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी विक्री केली आहे.