संकेश्वरात आठवडी बाजारात नियमांचा विसर
प्रतिनिधी/ संकेश्वर
कोरोनाचा संसर्ग जिल्हय़ासह हुक्केरी तालुक्यातही वाढत चालला आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी क्लोजडाऊन घोषित केला आहे. असे असले तरी सकाळच्या सत्रात म्हणजेच 6 ते 10 या वेळेत खरेदीस मुभा दिली आहे. मात्र याचा गैरफायदा घेत अनेकांकडून नियमांचे उल्लंघन करण्यात येत आहे. संकेश्वर शहरातही शुक्रवारी आठवडी बाजारात मोठी गर्दी होताना कोरोनाला आंमत्रण दिल्याचे दिसून आले. तर दहानंतर बाजारपेठेत संपूर्ण शुकशुकाट पसरला होता. दरम्यान सकाळच्या सत्रात गर्दी करुन दिवसभर घरी रहात असलो. तरी गर्दीतून घरी कोरोनाचा संसर्ग घेऊन जात आहोत. याची दखल प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे.
येथील मार्केट यार्डात आठवडी बाजार भरल्याने भाजीपाला व किराणा साहित्य खरेदीसाठी नागरिक घराबाहेर पडले होते. वेळेचे बंधन विचारात घेता दुकानदारांना ग्राहकांना साहित्य देण्यास तारांबळ उडत होती. सकाळी 4 तासांसाठी बाजारपेठे खुली होत आहे. यानतंर 10 वाजता दुकाने बंद करण्यात येत आहेत. यामुळे नागरिक खरेदीसाठी गर्दी करत आहेत. असे असले तरी नियमांचे पालन करण्यासाठी योग्य नियोजनही आवश्यक आहे. दररोज बाजारपेठेत जाण्याची आवश्यकता नाही. आठवडय़ातून एकदा जात बाजार आणल्यास अडचणी येणार नाहीत. मात्र दररोज अनावश्यक बाहेर पडताना समाजासह कुटुंबियांना त्रासदायक ठरणार आहे.
दरम्यान शहरातील काही दुकानदार चढय़ाभावाने मालाची विक्री करीत असल्याची चर्चा ग्राहकात दबक्या आवाजात सुरू आहे. याबाबत संबधित खात्याने लक्ष देणे हिताचे ठरणार आहे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. कोरोनाच्या संकटात याचा गैरफायदा घेणाऱया दुकानदारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणीही होत आहे.