प्रतिनिधी/ बेळगाव
गेल्या 10-12 दिवसांपासून पावसाची रिपरीप सुरू आहे. त्यामुळे हवेमध्ये गारवा निर्माण झाला आहे. याचबरोबर पावसामुळे उंच वाढलेल्या आणि लह्या भातांना फटका बसू लागला आहे. सध्या शेतकरी सोयाबिन, बटाटा, रताळी, भुईमूग काढणी करत आहेत. ते कामही खोळंबले आहे. पाऊस जाण्याची सारेजण वाट पाहत आहेत.
बासमतीसह लक्हे भात पोसवले आहे. उंच वाढल्यामुळे हे भात पावसामुळे पडू लागले आहे. शनिवारी सकाळीच पावसाने जोर धरला होता. जवळपास दीड-दोन तास दमदार पाऊस पडला. त्याचबरोबर दिवसभरही अधूनमधून पावसाची रिपरीप सुरू होती. या पावसाला सारेजणच कंटाळले आहेत. पाऊस कधी जाईल याचीच वाट पाहताना दिसत आहेत.
मंगळवारी पडलेल्या दमदार पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचून होते. शहरामध्ये सध्या विविध ठिकाणी स्मार्ट सिटीची कामे सुरू आहेत. त्यामुळे खोदाई करण्यात आली आहे. या पावसामुळे पाणी साचून चिखलाचे साम्राज्य पसरले होते. काही ठिकाणी काँक्रीटचे रस्ते केले जात आहेत. त्यावर पोती टाकण्यात आली आहेत. या पावसामुळे पोती भिजून दलदल पसरली आहे. त्यामधून वाहने चालविणे कसरतीचे होत होते.
पावसाने विश्रांती घेतली तरच साऱयांना दिलासा मिळणार आहे. गेल्या महिन्याभरापासून दमट हवामानामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे ऊन कधी पडणार आणि स्वच्छ वातावरण कधी मिळणार याकडेच साऱयांचे लक्ष लागले आहे. कोरोनामुळे जनता त्रस्त झाली असताना पावसानेही त्याच्यात भर घातली आहे. त्यामुळे जनता अक्षरशः पावसाला वैतागली आहे.
शनिवारी बाजारपेठेत दलदल निर्माण झाली होती. सकाळी पाऊस पडून गेल्यानंतर दुपारीही अधूनमधून पडत असलेल्या पावसामुळे रविवारपेठमध्ये काही ठिकाणी चिखल झाला होता. त्यामधून वाट काढत ये-जा करावी लागत होती.