बाजारपेठेतील चित्र, कोरोना नियमाचा फज्जा,
बेळगाव/ प्रतिनिधी
वाढत्या कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यात पुन्हा एकदा क्लोजडाऊनची घोषणा करून कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. त्य़ामुळे दररोज गजबजणाऱया बाजारपेठेत देखील मर्यादा आल्या असून सकाळी 6 ते 10 यावेळेत बाजारपेठ सुरू ठेवण्यात येत आहे. अत्यावश्यक गोष्टी या यावेळेत ग्राहकांना पुरविण्यात येत आहेत. त्यामुळे बाजारपेठेत सकाळी गर्दी दिसून येत असली तरी दिवसभर शुकशुकाट पहायला मिळत आहे.
मागील आठवडय़ात देखील विकेंड कर्फ्यूचा लागू नियम जारी करण्यात आला होता. त्यामुळे बाजारावर मर्यादा आल्या होत्या. त्य़ामुळे व्यापाऱयांना देखील फटका बसला. दरम्यान मंगळवारी रात्रीपासून राज्यात क्लोजडाऊनचा नियम लागू करण्यात आला. त्यानुसार बुधवारपासून सकाळच्या सत्रातच बाजारपेठेत खरेदी-विक्रीसाठी सुरू आहे. बाजारपेठेत विविध प्रकारच्या भाज्या दिसून येत असल्या तरी विपेत्यांना वेळेच्या मर्यादेमुळे घाईगडबडीत विक्री करावी लागत आहे.
केवळ सकाळच्या मर्यादीत वेळेत बाजारपेठेत खरेदी-विक्री सुरू असल्याने नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोना नियमाचा फज्जा उडताना दिसत आहे. त्यामुळे पुन्हा कोरोनाच्या संसर्ग वाढविण्याची भीती व्यक्त होत आहे. सकाळी बाजारपेठे खुली असली तरी दिवसभर मेडिकल वगळता सर्व दुकाने बंद असतात. त्यामुळे दिवसभर सर्व रस्ते निर्मनुष्य होत आहेत. शहरातील खडे बाजार, किलोस्कर रोड, समादेवी गल्ली, काकतीवेस रोड, शनिवार खुट आदी ठिकाणी बॅरीकेड्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनधारकांबरोबर पादचाऱयांची देखील हेळसांड होताना दिसत आहे.
कोरोनाला हरविण्यासाठी राज्यात विकेंड कर्फ्यूनंतर मंगळवारपासून क्लोजडाऊनची अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे विनाकारण घराबाहेर पडणाऱयांवर पोलीस कारवाई करत आहेत. शिवाय मुख्य चौकांमध्ये पोलीस तैनात आहेत. नेहमी गजबजणाऱया मारूती गल्ली, गणपत गल्ली, खडे बाजार, रामदेव गल्ली, बापट गल्ली, कडोलकर गल्ली यासह शहर परिसरात शुकशुकाट पहायला मिळत आहे.
गेल्या काही दिवसांपासून बाजापेठेवर परिणाम झालेला पहायला मिळत आहे. भाजीपाल्याचा दर काही प्रमाणात स्थिर असला तरी सुरळीत विक्री होत नसल्याचे दिसून येत आहे. ग्राहकांना देखील अपुऱया वेळेमुळे घाईगबडीतच खरेदी करावी लागत आहे. सध्या विवाह सोहळय़ांच्या हंगामाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे लग्नाच्या बाजारासाठी संबंधितांची धडपड सुरू आहे. मात्र क्लोजडाऊमुळे मर्यादा आल्याने लग्न कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी धावपळ होताना दिसत आहे.
वाढत्या खाद्य तेलाचा चटका
वाढत्या कोरोनाच्या संसर्गाबरोबर खाद्य तेलाच्या दरात देखील वाढ होत असल्याने सर्वसामान्यांना कोरोना काळात खाद्य तेलाचा चटका बसत आहे. मागील काही महिन्यापासून खाद्य तेलाचे दर वाढत चालल्याने गृहीणींबरोबर हॉटेल व्यवसायिकांचे बझेट कोलमडले आहेत.