बेळगाव /प्रतिनिधी :
चौथ्या टप्प्यात लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता आणल्यामुळे बरेच दिवस बंद असलेल्या बाजारपेठेत आता नागरिकांची वर्दळ वाढू लागली आहे. बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी वाढू लागली आहे. प्रशासनाने घालून दिलेल्या नियम व वेळेची अंमलबजावणी करत सायंकाळच्यावेळेत दुकाने बंद केली जात आहेत. त्यामुळे बाजारपेठेत सकाळी गर्दी तर सायंकाळी शुकशुकाट असे चित्र दिसून येत आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर साधारण 25 मार्चपासून बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. या काळात संपूर्ण वाहतूक बंद ठेवण्यात आल्याने किराणा मालाविना अनेकांचे हाल झाले. तर दरही भरमसाट वाढले. त्यामुळे ग्राहकांना फटका बसला. मात्र तिसऱया टप्प्यात काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली. त्यामुळे मर्यादित वेळेकरिता बाजारपेठा सुरू करण्यास मुभा देण्यात होती. त्यानंतर चौथ्या टप्प्यात नियमांमध्ये आणखी शिथिलता वाढण्यात आली आणि नवीन माल येण्यास प्रारंभ झाल्याने बाजारपेठ पूर्वपदावर येऊ लागली आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत दुकाने चालू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे यावेळेत खरेदीसाठी बाजारपेठेत वर्दळ वाढलेली पहायला मिळत आहे.
शहरातील गणपत गल्ली, समादेवी गल्ली, खडेबाजार, कलमठ रोड, मारुती गल्ली आदी ठिकाणी खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ वाढली आहे. सध्या काही प्रमाणात शिथिलता देण्यात आल्याने बस वाहतूकही सुरू आहे. त्यामुळे बाजारात येणाऱया नागरिकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे बाजारात गर्दी होताना दिसून येत आहे. शहरातील काही रस्ते वगळता संपूर्ण शहर वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहे.