प्रतिनिधी/ बेळगाव
विद्यागम भाग 2 ला प्रारंभ झाल्याने सरकारी शाळांमधील इ. 6 वी ते 8 वीचे वर्ग सुरू झाले आहेत. प्राथमिक शाळांना माध्यमिक शाळा जोडून नसल्याने सरकारी प्राथमिक शाळांचा विद्यागम कार्यक्रम सकाळच्या सत्रात सुरू आहे. दुपारच्या सत्रात शिक्षकांचा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू असून निष्ठाच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण घेण्यात शिक्षकवर्ग व्यस्त आहे. यामुळे सकाळी विद्यार्थ्यांची तर दुपारी शिक्षकांची शाळा सुरू असल्याचे चित्र सरकारी शाळांमधून अनुभवायला मिळत आहे.
विद्यागम कार्यक्रमांतर्गत सकाळी विद्यार्थ्यांची शाळा घेण्यात येत आहे. सकाळी 10 ते 12.30 या वेळेत एक दिवसाआड सहावी ते आठवीचे वर्ग भरविण्यात येतील. यामुळे सकाळपासूनच प्रशिक्षणात व्यस्त असणाऱया शिक्षकांना विद्यार्थ्यांना अध्यापन करावे लागणार आहे. यामुळे प्रशिक्षणाला सकाळचा ब्रेक लागला असून दुपारनंतर शिक्षकांची शाळा अर्थात प्रशिक्षण घेण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना केवळ सकाळच्या सत्रात बोलवायचे असले तरी शिक्षकांना मात्र पूर्णवेळ थांबावे लागत आहे. यामुळे सकाळी विद्यार्थ्यांसाठी तर दुपारी शिक्षकांसाठी शिक्षण सुरू आहे.
निष्ठाअंतर्गत शिक्षकांना 18 मॉडेलचे प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम आखण्यात आला आहे. त्यानुसार नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत सदर प्रशिक्षणाचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. प्रत्येक मॉडेल पूर्ण झाल्यानंतर परीक्षा असल्याने शिक्षकांकडून प्रशिक्षण गांभीर्याने घेतले जात आहे. नोट्स काढण्यापासून मॉडेल समजून घेण्यासाठी शिक्षक मन लावून ऑनलाईन प्रशिक्षण घेत आहेत. विद्यागमला ब्रेक लागल्यापासून शिक्षक सकाळपासूनच प्रशिक्षण घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. मात्र, आता अध्यापन प्रक्रियेमुळे शिक्षक दुपारनंतर प्रशिक्षणात व्यस्त आहेत. यामुळे सदर प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी शिक्षकांचा कौशल्य विकास होण्यास मदत होत आहे.