गेल्या 24 तासात देशात 2.68 लाख नवे रुग्ण, 402 जणांचा मृत्यू
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात शुक्रवारच्या चोवीस तासात 2 लाख 68 हजार 833 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच दिवसभरात कोरोनामुळे 402 लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट हा 16.66 टक्के झाला असून सक्रिय रुग्णसंख्या 14 लाख 17 हजार 820 वर पोहोचली आहे. शुक्रवारपर्यंत देशात सक्रिय रुग्णांची संख्या ही 12 लाख 72 हजार 073 इतकी होती. शनिवारी त्यात आणखी वाढ होत 14 लाखांच्या वर पाहोचली आहे. तरीही इस्पितळात उपचार घेणाऱयांची संख्या नियंत्रणात असल्यामुळे सध्या आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळालेला आहे. दरम्यान, कोरोनासोबतच ओमिक्रॉनच्या रुग्णसंख्येतही मोठी वाढ झाली आहे. आत्तापर्यंत ओमिक्रॉनचे 6 हजार 41 रुग्ण आढळून आले आहेत.
देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. कोरोनाबरोबरच ओमिक्रॉनचे रुग्णही वाढत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे आत्तापर्यंत 4 लाख 85 हजार 752 लोकांनी आपला जीव गमावला आहे. शुक्रवारी दिवसभरात 1 लाख 22 हजार 622 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. तर देशात आत्तापर्यंत 3 कोटी 49 लाख 47 हजार 390 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
आत्तापर्यंत देशात 6 हजार 41 ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने शनिवारी दिली. शुक्रवारपर्यंत हा आकडा 5 हजार 753 होता. सध्या देशातील जवळपास 27 राज्यांमध्ये ओमिक्रॉनचा शिरकाव झाला आहे. यामध्ये सर्वात जास्त ओमिक्रॉनचे रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत, तर त्यापाठोपाठ दिल्लीमध्ये सर्वाधिक ओमिक्रॉनबाधित आहेत.
156 कोटींहून अधिक लसीकरण
सध्या देशात लसीकरण देखील वेगाने सुरू आहे. ज्या लोकांनी अद्याप लस घेतली नाही त्यांनी लस घेण्याचे आवाहन केंद्र सरकारकडून वेळोवेळी करण्यात येत आहे. आत्तापर्यंत देशात 156 कोटींहून अधिक लसींचे डोस देण्यात आले आहेत. शुक्रवारी दिवसभरात देशात 58 लाख 2 हजार 976 लसींचे डोस देण्यात आले आहेत. तर आत्तापर्यंत एकूण 156 कोटी 2 लाख 51 हजार 117 लसींचे डोस देण्यात आले आहेत.