देशात नव्या बाधितांपेक्षा डिस्चार्जचा आकडा वाढतोय
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशातील कोरोना बाधितांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात घट होत असल्याची आकडेवारी शनिवारी समोर आली. शुक्रवारी दिवसभरात देशात 3 लाख 26 हजार 098 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली असून 3 हजार 890 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याचवेळी 3 लाख 53 हजार 299 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतल्यामुळे सक्रिय रुग्णांच्या आकडेवारीत मोठी घट झाली आहे.
देशात आतापर्यंत 2 कोटी 43 लाख 72 हजार 907 इतक्या बाधितांची नोंद झाली आहे. एकंदर बाधितांपैकी 2 लाख 66 हजार 207 जणांचा बळी गेला असून 2 कोटी 4 लाख 32 हजार 898 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. आता देशात 36 लाख 73 हजार 802 इतके सक्रिय रुग्ण विविध इस्पितळांमध्ये उपचार घेत असल्याचे आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्र, दिल्लीसह काही राज्यांमध्ये दैनंदिन येणाऱया आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱया रुग्णांची संख्या जास्त होत आहे. महाराष्ट्रात शुक्रवारी 53 हजार 249 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर 39,923 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. राज्यात अन्य काही राज्यांमध्येही स्थिती सुधारत आहे. बहुतांश राज्यांमध्ये कोरोना संसर्गाचा कल उतरणीकडे लागला आहे. संसर्ग होणाऱयांची संख्या कमी होत आहे. परंतु कर्नाटक, आंध्रप्रदेश, बिहार, केरळ, झारखंड, राजस्थान, हरियाणा, तेलंगणा आणि तामिळनाडूमध्ये नव्या बाधितांचा आकडा वाढताना दिसत आहे.