जीएसटीतून चांगला महसूल प्राप्त, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती
प्रतिनिधी/ पणजी
येत्या 6 फेब्रुवारी रोजी राज्याचा अर्थसंकल्प 2020-2021 राज्य विधानसभेत मांडण्यात येणार असून सक्षम आणि ग्रामीण विकासावर त्यात भर देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक व्हावा म्हणून त्यात सर्वांच्या सूचना, तक्रारी, गाऱहाणी, आक्षेप यांचा विचार करण्यात येणार असून महसूल वाढीसाठी सर्व ते प्रयत्न केले जातील, असे डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले आहे.
विधानसभा संकुलातील आपल्या दालनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. सावंत म्हणाले की, मागे सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पाचे नेमके काय झाले? याचा आढावा घेण्याचे काम सुरू असून त्यावरील कृती अहवालही तयार करण्यात येणार आहे. यंदाचा अर्थसंकल्प चांगला व्हावा आणि तो समतोल असावा म्हणून सरकार विविध मार्गाने प्रयत्न करीत आहे. अर्थसंकल्पाबाबत अनेकांचे फोन, इमेल येतात, पत्रेही येतात. त्या सर्वांचा विचार सरकार करणार असून विविध क्षेत्रातील तज्ञ मंडळींनी सरकारला त्यासंदर्भात सूचना पाठवाव्यात, असे आवाहन डॉ. सावंत यांनी केले आहे.
जनतेच्या सूचनांचा अंतर्भाव करणार
पर्यटन धोरण लवकरच तयार करून ते जाहीर केले जाणार असून महसूल प्राप्तीचे नवे मार्ग शोधण्यात येतील, तसेच जनतेकडून जे मार्ग सूचविले जातील त्यांचाही अंतर्भाव अर्थसंकल्पात केला जाणार असल्याचे डॉ. सावंत यांनी नमूद केले. रोजगार हा अर्थसंकल्पाचा विषय असू शकत नाही तर पर्यटनात वाढ, किंवा महसूल वाढ हे विषय त्यासाठी महत्वाचे आहेत, असे मतही त्यांनी मांडले.
राज्याचा चौफेर विकास कसा होईल यावर अर्थसंकल्पातून भर देण्यात येणार असून वित्त आयोगाकडे योग्य ती आर्थिक मदत मागण्यात आली आहे. जीएसटी माध्यमातून योग्य तो महसूल प्राप्त होत असल्याचा दावा डॉ. सावंत यांनी केला आहे.