गोकुळच्यानिमित्ताने घराणेशाही पुन्हा चर्चेत, उमेदवारीसाठी वारसदारांचीच नावे पुढे
यशवंत लांडगे / कोल्हापूर
खासदारकी, आमदारकी एवढेच काय मंत्रीपदही त्यांनाच. कारखान्याचे चेअरमनपद त्यांच्याच घरात. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि जिल्हा बँकेलाही त्यांचेच वारसदार. आता गोकुळसाठी इच्छुकांच्या यादीतही घराणेशाहीचाच वरचष्मा… सगळं नेत्यांनीच घेतल्यावर कार्यकर्त्यांनी काय करायचं? असा सवाल आता गोकुळ दूध संघ निवडणुकीच्या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
राजकारणातील घराणेशाही हेच उमेदवारीचे क्वॉलिफकेशन असल्याचे प्रत्येक निवडणुकीत पहायला मिळते. घराणेशाहीला विरोध, घराणेशाही मोडीत काढा, अशी ओरड वारंवार होते. पण ती काही मोडीत निघाल्याचे पहायला मिळत नाही. गल्लीपासून दिल्लीपर्यंत फोफावलेल्या या घराणेशाहीला मुजरा घालण्यात अनेक कार्यकर्ते धन्यता मानतात. नेत्याला आबासाहेब, नेत्याच्या मुलाला दादासाहेब म्हणत केवळ सतरंज्या उचलण्यातच आयुष्य खर्ची घालणारे निष्ठावंत कमी नाहीत. काहीजण घराणेशाहीविरुध्द बंड करून राजकारणात पाय रोवतातही, पण पुढे जाऊन त्यांच्यातही घराणेशाहीचा उगम होतो.
अनेक घरात आमदारकी, खासदारकी असतानाही त्यांनाच किंवा त्यांच्या वारसांना साखर कारखान्याचे चेअरमनपद, जिल्हा बँक, जिल्हा परिषद, पंचायत समिती, मार्केट कमिटीसह अन्य संस्थांवर संधी दिली जाते. साहेबांनी गेल्यावेळी शब्द दिला आहे, असे सांगत कार्यकर्ते पाच वर्षे जोरदार तयारी करतात. त्यांच्यात उमेदवारीसाठी रस्सीखेच होते, आणि त्यांच्यातील वाद टाळण्यासाठी `सर्वसमावेशक’ या गोंडस नावाखाली पुन्हा नेता किंवा त्यांच्या वारसदाराचेच नाव पुढे येते. किंबहुना पद्धतशीरपणे ते पुढे आणले जाते आणि पर्यायाने कार्यकर्त्यांच्या खांद्यावर पुन्हा प्रचाराचा झेंडा येतो. पुढच्यावेळी संधी मिळेल या आशेवर कार्यकर्ताही मग पुन्हा निष्ठेचे ढोल बडवत राहतो.
गोकुळ दूध संघाच्या निमित्ताने पुन्हा एकदा घराणेशाहीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. खासदार संजय मंडलिक, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मुलाचे नाव चर्चेत आहे. माजी आमदार संजयबाबा घाटगे यांचे पुत्र अंबरिष व सत्यजित पाटील-सरुडकर यांच्या मातोश्री संचालक आहेतच. भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या पत्नींचे नावही उमेदवारीसाठी पुढे आले आहे. खासदार धैर्यशील माने यांनी अजूनही पत्ता खोलला नाही. मात्र सत्ताधारी आघाडीचे नेते आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, अरूण नरके, विरोधी आघाडीचे मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या वारसदारांचीही जोरदार चर्चा आहे.
आमदार राजेश पाटील, राजू आवळे स्वतः इच्छुक असल्याची चर्चा आहे. आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, माजी आमदार चंद्रदीप नरके यांचे बंधू अजित नरके, माजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड यांचे पूत्र करणसिंह, श्रीपतराव शिंदे यांच्या कन्या स्वाती कोरी, माजी आमदार संपतराव पवार-पाटील, के. पी. पाटील, बजरंग देसाई, दिनकरराव जाधव यांचे पुत्र यांची नावेही उमेदवारीसाठी घेतली जात आहेत. मुरगुडचे पाटील बंधू यांच्यासह आजी-माजी आमदार, त्यांचे वारसदार, मोठमोठÎा पदांवर असणारे नेते, त्यांचे वारसदार, गोकुळचे आजी-माजी संचालक आणि वारसदार यांच्यातच आता उमेदवारीसाठी घमासान सुरु झाले असून, काही नेत्यांनी दुसऱया फळीतील नेत्याचे नाव पुढे केले असले तरी त्यांतही विधानसभेचे गणित दडले आहे.
या सगळÎा राजकीय घुसळणीत निष्ठावंत कार्यकर्ते मात्र बाजूला फेकले जात आहेत. मीच उमेदवार, साहेब मला यंदा नक्की संधी देणार, या भ्रमात असणाऱया कार्यकर्त्यांना अडचणींचा डोंगर आणि निष्ठेची आन घालून पुन्हा सतरंज्या अंथरायला लावून सत्तेची खुर्ची आपल्याच घरात ठेवण्यास नेते सज्ज झाले आहेत.
त्यांची मैत्री राजकारणापलीकडची, कार्यकर्त्यांची मात्र गद्दारी
राजकारणाच्या रणधुमाळीत निष्ठावंत कार्यकर्त्यांचे गट गावागावात एकमेकांशी भिडत असतात. वर्षानुवर्षे वैर पत्करत घराघरात पुढारी तयार होत असतात. पण स्थानिक राजकारणाच्या निमित्ताने ते एकत्र आलेच तर त्यांना `गद्दार’ म्हणून डिवचले जाते. पण सोईच्या राजकारणासाठी नेते जेव्हा गळÎात गळे घालतात, मांडिला मांडी लावून बसतात, तेव्हा मात्र `राजकारणापलीकडची मैत्री’ अशी पोस्ट सोशल मिडीयावर टाकणारेही सर्वसामान्य कार्यकर्तेच असतात.