देशाला प्राथमिकता देणाऱयांचे स्वागत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राजस्थानात काँग्रेस सरकार आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर नाराज असलेले काँग्रेस नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यासाठी भाजपने स्वतःचे दरवाजे खुले केले आहेत. देशाला प्राथमिकता देणाऱया सर्व लोकांसाठी पक्षाचा दरवाजा खुला असल्याचे म्हणत भाजप नेत्याने पायलट यांना अप्रत्यक्षपणे संदेश दिला आहे.
काँग्रेस पक्षाकडे कुठलेच व्हिजन राहिलेले नाही, याचमुळे नेत्यांना काँग्रेस सोडून व्हिजन असलेल्या पक्षामध्ये जावे लागणार आहे. देशाला प्राथमिकता देणारे आणि ‘इंडिया फर्स्ट’ विचारसरणी असलेल्या सर्व लोकांसाठी आमच्या पक्षाचे दरवाजे खुले असल्याचे उद्गार खासदार राज्यवर्धन सिंग राठौड यांनी काढले आहेत.
काँग्रेसचे नेतृत्व कमजोर
राष्ट्रीय स्तरावर पक्षाचे नेतृत्व कमजोर झाल्यास क्षेत्रीय नेते मनमानी करू लागतात. पंजाब असो किंवा राजस्थान व्हिजन नसल्यानेच काँग्रेसचे नेते अन्य पक्षांमध्ये सामील होणार असल्याचे म्हणत राठौड यांनी काँग्रेस नेतृत्वाला लक्ष्य केले आहे. राजस्थानात कोरोना संकटावर योग्य व्यवस्थापन करणे अपेक्षित असताना लसींचे डोस कचऱयाच्या पेटीत आणि नाल्यात मिळत आहेत. काँग्रेसचे नेते केवळ सत्तेवर राहण्याचे व्यवस्थापन करत आहेत अशी टीकाही त्यांनी केली आहे.
पद, सत्ता, आणि पैशावरून अडीच वर्षांपासून राजस्थान काँग्रेसमध्ये कलह सुरू आहे. कधी काँग्रेसचे आमदार कित्येक महिने हॉटेल्समध्ये राहतात, तर कधी शासकीय यंत्रणेचा वापर फोन टॅपिंगसाठी होतो असे राठौड यांनी म्हटले आहे. पायलट गटाच्या आमदाराने यापूर्वी काँग्रेस सरकारकडून फोन टॅपिंग करविले जात असल्याचा आरोप केला होता.