ऑनलाईन टीम / मुंबई :
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले पोलीस आधिकारी सचिन वाझे यांची क्राईम ब्रान्चमधून बदली करण्यात आली आहे. वाझे यांची नागरी सुविधा केंद्रात बदली करण्यात आली आहे. काल रात्री पोलीस मुख्यालयातून सचिन वाझे यांच्या बदलीसंदर्भात आदेश काढण्यात आले आहेत. सचिन वाझे आतापर्यंत मुंबई गुन्हे शाखेत कार्यरत होते.
यापूर्वी सचिन वाझे हे मुंबई पोलिसातील गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख होते. मात्र, मनसुख हिरेन प्रकरणामुळे आता त्यांना CFC विभागात टाकून साईडलाईन केल्याचे स्पष्ट दिसत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुख पदावरुन हटवल्याची घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासून सचिन वाझे यांची बदली आता कोणत्या विभागात होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या सचिन वाझे यांची दहशतवाद विरोधी पथक (ATS) ने तब्बल दहा तास चौकशी केली आहे. मी ती स्कॉर्पिओ वापरली नाही, माझा धनंजय गावडेंना ओळखतही नाही, अशी माहिती सचिन वाझेंनी एटीएसला दिली. महाराष्ट्र एटीएस मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाची चौकशी करत आहे. या प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे नाव चांगलेच चर्चेत आले आहे.