वृत्तसंस्था/ मुंबई
नैसर्गिक आपत्ती, कोरोनासारख्या महामारी व संकटसमयी आपल्या नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱया महाराष्ट्र पोलिसांना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, माजी क्रिकेटपटू अजित आगरकर व झहीर खान यांनी सॅल्युट केला आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या सन्मानार्थ या सर्वांनी सोशल मीडियावर आपला ‘डीपी’ फोटो म्हणून महाराष्ट्र पोलिसांचा लोगो लावला आहे. महाराष्ट्र पोलीस हे संकटाच्यावेळी सदैव नागरिकांच्या मदतीला धावून आले आहेत असे ट्विट विराटने केले आहे. सध्याच्या घडीला गेल्या दोन महिन्यापासून कोरोनाविरुद्ध लढाईत महाराष्ट्र पोलिस एखाद्या योद्धय़ाप्रमाणे रस्त्यावर उतरले आहेत. यासाठी त्यांच्या सन्मानार्थ मी सोशल मीडियावर महाराष्ट्र पोलीसांचा लोगो लावत आहे. चाहत्यांनीही अशाच पद्धतीने महाराष्ट्र पोलीसांच्या कामाचा गौरव करावा, असे आवाहनही त्याने केले आहे.