भोजनाऐवजी द्रोणातून खीर-तांदळाची खिचडी मिळणार
शाहूपुरी / वार्ताहर :
राज्य सरकारने मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सज्जनगडावर भाविक, पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सज्जनगड येथे पूर्वीप्रमाणे निवासाची सोय असणार आहे. भोजनाऐवजी द्रोणातून खीर आणि तांदळाची खिचडी प्रसाद म्हणून देण्याचा निर्णय रामदास स्वामी संस्थानच्यावतीने घेण्यात आल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब स्वामी यांनी दिली.
स्वामी म्हणाले, सध्या थंडीचे प्रमाण ही चांगले वाढू लागल्यामुळे सज्जनगडावर आल्हाददायक वातावरण आहे. त्यामुळे पर्यटक आणि भाविकांच्या संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर सर्वत्रच आता पर्यटकांचीही गर्दी वाढत आहे. पण कोरोना अद्यापही कमी झालेला नाही. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे तितकेच महत्वाचे आहे. त्यातच सज्जगड येथील निवासाची सोय असणाऱ्या खोल्या ही गेल्या कित्येक दिवसांत बंदच असल्याने स्वच्छता करणे ही महत्वाचे असल्याने काही दिवस अजून येथील निवास व्यवस्था ही बंदच राहणार आहे. भोजन व्यवस्था सुरु ठेवल्यास सुरक्षित अंतर ठेवणे कठीण जाणार आहे. त्यामुळे भाविकांना द्रोणातून प्रसाद दिला जाईल.
नागरिकांनी गजबजू लागलेल्या गडावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वजण सॅनिटाझर, मास्क आणि सामाजिक अंतराचे पालन करत असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.