केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची राज्यांना सूचना : सप्टेंबर अन् ऑक्टोबर महिना महत्त्वाचा ठरणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशभरात कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये घट होत असताना केरळमधील स्थितीने चिंतेत भर पडली आहे. मागील 24 तासांमध्ये कोरोनाच्या नव्या सापडलेल्या बाधितांपैकी 58.4 टक्के रुग्ण केरळमधील असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही, याचमुळे आगामी सणासुदीच्या काळात खबरदारी घेतली जाणे आवश्यक असल्याचेही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
केरळ या एकमात्र राज्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1 लाखाहून अधिक आहे. तर महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्रप्रदशमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 10 हजारांपासून 1 लाखापर्यंत आहे. देशाच्या 41 जिल्हय़ांमध्ये साप्ताहिक संक्रमण दर 10 टक्क्यांहून अधिक असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
देशात कोरोनाची दुसरी लाट अद्याप कायम आहे. याचमुळे आम्हा सर्वांना खबरदारी बाळगण्याची गरज आहे. विशेषकरून सणांनंतर वाढलेली रुग्णसंख्या पाहता खबरदारी आवश्यक आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिना आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत, कारण आम्ही या महिन्यांमध्ये सण साजरे करणार आहोत. याचमुळे आम्ही कोरोना संक्रमणाचा विचार करून अन् योग्य ती काळजी घेत सण साजरे करण्याची गरज असल्याचे उद्गार केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी काढले आहेत. कोरोनावरील लस रोगाची तीव्रता कमी करण्यासाठी आहे, याचमुळे लसीकरणानंतरही मास्कचा वापर अत्यंत आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
देशांतर्गत प्रवासाबद्दल सरकारचे स्पष्टीकरण
केंद्र सरकारने पुन्हा एकदा देशांतर्गत प्रवास करणाऱया लोकांसाठी कोरोना विषयक दिशानिर्देशांवरून स्पष्टीकरण दिले आहे. आरोग्य मंत्रालयानुसार केंद्र सरकारने आंतरराज्य प्रवासासाठी कोरोना चाचणीची अनिवार्यता हटविली आहे, पण एखाद्या राज्याने असा नियम स्वतःच्या स्तरावर लागू केला असल्यास त्याविषयी माहितीचा प्रसार करत राहण्यात यावा. नागरिक देशात हवाई, रस्ते आणि रेल्वेच्या माध्यमातून कुठल्याही अडचणीशिवाय प्रवास करू शकतात. लसीकरणाचे प्रमाणपत्र असलेल्या लोकांकडून आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल मागण्यात येऊ नये असे आवाहन राज्यांना करण्यात आले आहे. तसेच 14 दिवसांपूर्वीपर्यंत कोरोनाबाधित असलेल्यांनाही सूट मिळावी असे म्हटले गेले आहे.
राज्यात प्रवेश करताना एखाद्या व्यक्तीत तापाची लक्षणे दिसल्यास त्याची रॅपिड टेस्ट करविली जाऊ शकते. तसेच एखाद्या राज्यात कोरोनाचे रुग्ण अचानक वाढल्यास राज्य स्वतःच्या हिशेबानुसार कठोर निर्बंध लादू शकते. स्थानिक स्तरावरही कंटेनमेंट लागू करू शकते असे केंद्र सरकारने म्हटले आहे.