व्हॅलेंटाईन डे नावाचा प्रकार गेल्या दोनचार दशकातला. पूर्वी निदान आपल्याकडे तरी नव्हता. कोणतेच ‘डे’ नव्हते. पण म्हणून काय लोक एकमेकांवर प्रेम करीत नव्हते? त्यांची लग्ने होत नव्हती? सगळे होत होते फक्त माध्यमे वेगळी होती. अगदी रुक्मिणीने देखील श्रीकृष्णाला प्रेमपत्र लिहिल्याची लोककथा आहे. आपल्याकडेही पूर्वी वसंतोत्सव होता. कारण एकच. प्रेम ही नैसर्गिक भावना आहे. व्हॅलेंटाईन डेचे प्रस्थ वाढत गेले तसा तो दिन न राहता सप्ताह बनला. फूल देणे, मागणी घालणे, चॉकलेट देणे वगैरे करीत सातव्या दिवशी त्याची सांगता होऊ लागली. त्यातल्या चॉकलेटबद्दल काही लिहायचे आहे.
आमच्या लहानपणी चॉकलेटचे फार प्रस्थ नव्हते. गोळय़ा-चॉकलेट खाल्ल्यावर दात किडतात असे मोठी माणसे सांगत. उन्हाळी सुट्टीत एसटीच्या प्रवासात मात्र तहान भागवण्यासाठी लेमन-ऑरेंज नावाच्या अर्धचंद्राकृती किंवा संत्र्याच्या फोडीच्या आकारातील गोळय़ा चघळायला मिळत. एरवी आयुष्यात चमत्कार घडून खिशात पैसे आले तर एक आणा दिल्यावर किराणा दुकानात मूठभर विविध आकारांच्या रंगीत गोळय़ा मिळायच्या. विविध आकार म्हणजे बाहुली, ससा, मोटर, विमान, हत्ती, असे काहीही. पेपरमिंटच्या आयताकृती चिमुकल्या गोळय़ांचं लांबोळकं पाकीट दोन प्रकारात मिळायचं. पांढऱया आणि गुलाबी. त्यात किती गोळय़ा असत हे आता लक्षात नाही. पण एकदा ते उघडलं की अजून एक, अजून एक करीत सगळं सहजी संपून जाई. क्वचित आजी ‘तोंडाला चव नाही’ या कारणास्तव एक रुपयाच्या नाण्याच्या आकाराएवढय़ा आणि जाडजूड पेपरमिंटच्या गोळय़ा दुकानातून मागवायची. या गोळय़ा पाकिटात नसून बरणीत ठेवलेल्या असत. दुकानदार कागदाच्या पुडीत बांधून देई. घरी येताना पुडी सोडून त्यातली एखादी गोळी तोंडात टाकायची आणि पुडी व्यवस्थित बांधायची हे कसब लहानपणी आत्मसात केलेलं होतं.आमच्याच वाडय़ात एक परप्रांतीय कुटुंब होतं. त्यातल्या समवयस्क मुलीची एक आठवण आहे. तिच्या वडिलांना बऱयापैकी पगार होता. पगाराच्या दिवशी ते तिच्यासाठी रावळगाव कंपनीच्या गोळय़ा आणत. प्रत्येक गोळी प्लास्टिकच्या सुबक वेष्टनात गुंडाळलेली. तिला मिळालेली एक गोळी ती उघडायची फ्रॉकच्या टोकात गुंडाळून चिमणीच्या दातांनी दोन तुकडे करून एक मला द्यायची. तोच आमच्या बालपणीचा चॉकलेट डे! मी दहावीत असताना विषमज्वर झाला. त्यातच रेवती गेली. ते बिऱहाड पुणे सोडून गेलं.