आमदार डिलायला लोबो : कायद्यानुसार रेस्टॉरंटला 15 दिवसांची नोटीस देणे आवश्यक : राजकीय सुड उगविण्यासाठीच आमच्या कुटुंबाला टार्गेट
प्रतिनिधी /म्हापसा
राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे सध्या आम्हा लोबो कुटुंबियांची सतावणूक करीत आहेत. या प्रकरणी आम्ही कायद्याचा सल्ला घेऊन न्यायालयात धाव घेतली आहे, अशी माहिती शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो यांनी दिली.
अन्न व पुरवठा खात्याच्या कायद्यानुसार अधिकाऱयांनी वास्तविक आमच्या रेस्टॉरंटला 15 दिवसांची नोटीस बजावणे गरजेची होती. त्या कालावधीत आम्ही उत्तर न दिल्यास कारणे दाखवा नोटीस बजावून ते हॉटेल वा रेस्टॉरंट परवाना रद्द करायला हवा. पण या कायद्याचे पालन केले नाही. कायदा सर्वांना समान असायला हवा. शुक्रवारी संबंधित खात्याचे अधिकारी येऊन तपासणी करतात व सोमवारी रेस्टॉरंट बंद ठेवा म्हणून सांगतात. हे चुकीचे आहे. 15 दिवसांची नोटीस बजवा, हे आम्ही राजकीय म्हणून नव्हे तर कायद्यानुसार सर्वांवर समान कारवाई व्हायला हवी, ते खात्याने केले नाही. आम्ही या विरोधात न्यायालयात धाव घेतली असल्याची माहिती आमदार डिलायला लोबो यांनी दिली.
मायकल लोबो काँग्रेसमध्ये गेल्यानेच आम्हाला टार्गेट केले जाते
मायकल लोबो भाजप सोडून काँग्रेसमध्ये गेले, याचा सूड उगवण्यासाठीच आम्हाला मुद्दामहून टार्गेट केले जात आहे. आम्ही 20 वर्षे राजकारणात आहोत. आणि आमचा व्यवसाय त्यापूर्वीपासून आहे. आतापर्यंत अधिकाऱयांनी कधीच आमच्यावर कारवाई केली नाही. आताच ही कारवाई केली जाते म्हणजे यात ही सुडाची भावना दिसत आहे, असे आमदार डिलायला लोबो यांनी यावेळी सांगितले. आपण याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असून मुख्यमंत्र्यांनी आपण यात लक्ष घालतो, असे आश्वासन दिले आहे, असे लोबो म्हणाल्या.
जनतेला वेळोवेळी सहकार्य करणाऱया कार्यकर्त्यांना निवडून द्या!
पंचायत निवडणुका येत्या 10 ऑगस्ट रोजी घेण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. त्या आदेशाचे आपण स्वागत करीत असल्याचे आमदार डिलायला लोबो यांनी सांगितले. सध्या पावसाळी मोसम आहे. पंचायतीत सरपंच नाही. त्यामुळे प्रशासक नियुक्त केले आहेत. एक झाड पडले की काय होते ते सर्वांना माहीत आहे. पंचायत म्हणजे आपले कुटुंब आहे. वीज गेली की आम्हाला फोन येत होते. आज आमदार झाल्यावरही येत आहेत. हे जवळचे नाते ग्रामस्थ व पंचायत सदस्याचे असते. आज कोणतेही प्रश्न घेऊन ग्रामस्थ त्या भागाच्या पंच सदस्याकडेच जातात. प्रशासक कोण आला आहे, कुणालाच माहीत नसते. पंचयातीत सरपंच, पंचायतमंडळ असणे गरजेचे आहे. उच्च न्यायालयाने योग्यच निर्णय दिला असून त्याचे स्वागत व अभिनंदन करते, असेही आमदार डिलायला लोबो म्हणाल्या. शिवोलीवासियांच्या प्रसंगासाठी रात्रीअपरात्री कोणत्याही क्षणी जे कार्यकर्ते धावतात अशा लोकांनाच निवडून द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. भाजपचा पंचायत निवडणुका पुढे ढकलण्याचा इरादा होता. मात्र उच्च न्यायालयाने आपला योग्य निर्णय देत निवडणुका येत्या 10 ऑगस्टला घेण्याचा निर्णय घेतला तो स्वागत करणारा आहे, असे डिलायला लोबो म्हणाल्या.
हणजुणेत रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू !
हणजूण पंचायत क्षेत्रात सर्वत्र रस्त्यावर भले मोठे चर आणि खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे गावच्या नावाबरोबर राज्याचे नाव बदनाम होत आहे. त्यात पर्यटकांना अपघात झाल्यावर ते गोव्याचे नाव आणखी बदनाम करतात. मंत्री नीलेश काब्राल यांनी याबाबत संबंधित कंत्राटदाराला यापूर्वीच सर्व खड्डे व चर त्वरित बुजविण्याचे आदेश दिले आहेत. सध्या रस्ते बुजविण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती आमदार डिलायला लोबो यांनी दिली.
भाजपात जाणे न जाणे हा वेगळा प्रश्न
भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यासाठीच लोबो कुटुंबियांना टार्गेट केले जाते काय? असा प्रश्न डिलायला लोबो यांना पत्रकारांनी केला असता त्या म्हणाल्या, आम्हाला टार्गेट करतात करा; मात्र आमचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आम्हाला वेळ द्या. भाजपात जाणे किंवा न जाणे ही वेगळी गोष्ट आहे. मात्र आम्हाला नाहक टार्गेट करू नका, असे आवाहन आमदार डिलायला लोबो यांनी सरकारला केले.