पैकुळ पदपूल सुरक्षीत, मामलेदारांनी केली पहाणी
प्रतिनिधी /वाळपई
सत्तरीत तीन दिवसानंतर काल पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतली. परिणामी रगाडा, म्हादई नदीच्या पाण्याची पातळी उतरली. गेले दोन दिवस पाण्याखाली गेलेला पैकुळ पदपूल सुरक्षित आहे. मात्र संरक्षक पाईप वाहून गेल्याने सदर पुलावरून चालणे धोकादायक बनले आहे. नुकसानग्रस्त पुलाची दुरुस्ती लवकर हाती घेण्यात येणार असल्याचे अधिकाऱयांनी स्पष्ट केले आहे.
नदीच्या पाण्याच्या पातळीचा अंदाज घेण्यासाठी सत्तराचे मामलेदार कौशिक देसाई यांनी जलस्रोत खात्याचे सहाय्यक अभियंता शैलेश पोकळे व अझीझ शहा यांच्या समवेत पाहणी केली. पूलाला सध्यातरी कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचे स्पष्ट केले आहे.
पैकुळ पुलाचे संरक्षक पाईप वाहून गेल्यामुळे सदर पूल चालण्यासाठी धोकादायक बनला आहे. पुलाची दुरुस्ती ताबडतोब हाती घेण्यात येणार असल्याचे जलस्रोत खात्याच्या अधिकाऱयांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सत्तरी तालुका आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष सतर्क करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र गेल्या दोन दिवसापासून 24 तास उपलब्ध असलेला हेल्पलाईन नंबर चालत नाही. तसेच वाळपई अग्निशमन दलाचा दूरध्वनी क्रमांकही चालत नसल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
अग्निशामन दलाचा दूरध्वनी नादुरूस्त आहे. गेल्या दोन दिवसांपासून दूरध्वनी अधून मधून चालत नाही. याबाबत दूरध्वनी खात्याकडे तक्रार केली. मात्र त्यांनी या संदर्भात अजून गांभीर्याने लक्ष दिले नाही, असे अग्निशमन दलाचे अधिकारी संतोष गावस यांनी सांगितले.