अलीकडे जनतेच्या सत्तेकडून मोठय़ा अपेक्षा आहेत आणि त्या चुकीच्या नाहीत. राजकारणी मंडळींना सत्ता मिळवणे, सत्ता राखणे आणि मतदारांचे समाधान करणे याचबरोबर विविध घटकांचे समाधान साधणे यासाठी कसरत करावी लागते. मतदान यंत्रणा उभारणे, प्रचार करणे, वारे अनुकूल करणे आणि मतदान पदरात पाडून घेणे हे कौशल्य असते. भारतासारख्या विविध संस्कृतीने नटलेल्या आणि जात, धर्म व बहुविध पक्ष, पंथात विभागलेल्या मतदारांचा विश्वास मिळवणे व राखणे हे येरागबाळय़ाचे काम नाही. मतदार हा राजा असतो. जाणता असतो. वरवर जरी वाटत असले, पावसाने मतदान फिरवले किंवा कोणतेही बटण दाबा मत अमक्यांनाच पडते तरी ते तितकेसे खरे नसते. मतदारांची मर्जी राखणे, कारभार पारदर्शी आणि विकासाभिमुख करणे, पक्ष कार्यकर्ते व जनता यांचे समाधान साधताना प्रगतीची गती कायम ठेवणे याला महत्त्व असते. नवी पिढी आणि विविध जाती-धर्मात विभागलेला समाज व त्यांच्या मतपेटय़ा सांभाळून इमेज वाढवणे सोपे नसते. या साऱया पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी सतत सत्तांतर, परिवर्तन, असमाधान असे ट्रेंड दिसतात आणि मिळालेली सत्ता पुन्हा मिळवण्याची संधी अंधुक दिसत असल्याने संधीचे सोने करण्यावर अनेकांचा प्रयत्न होत असतो. त्यातूनच ऑपरेशन कमळ किंवा घोडेबाजार भरत असतात. अमेरिकेत सत्तांतर झाले आणि मंगळवारी बिहारचे निकाल येतील. तेथेही सत्तांतर होणार असे एक्झिट पोलचे अंदाज सांगत आहेत. बिहारमध्ये तिसऱया टप्प्यातील मतदान झाले आणि एक्झिट पोल घेण्यात आले. त्यामध्ये महाआघाडीची सरशी होणार असे दिसते आहे. भाजप आणि संजद पिछाडी घेणार बिहारमध्ये सत्तांतर होणार असे अनेकांनी अंदाज व्यक्त केले आहेत. तेथे काटय़ाची लढत तर आहेच पण अपक्षांना महत्त्व येणार असेही दिसते आहे. बिहारमध्ये नितीशकुमार यांनी सत्ता राखण्यासाठी सतत निरनिराळे प्रयोग केले. कधी लालूप्रसाद यांच्याशी जुळवून घेतले तर कधी भाजपाला जवळ केले. पण या निवडणुकीत तेजस्वी यादव यांचा जोर दिसत होता आणि एक्झिट पोलमध्ये सत्तांतराचे संकेत त्यांच्या बाजूनेच दिसत आहेत. पण,एकूण लढत काटय़ाची आहे. त्यामुळे अखेरच्या क्षणी काय होते, कौल कसा येतो व राजकीय पक्ष कशा भूमिका घेतात हे दिसून येईल. महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना महायुती एकत्रित लढली आणि निकालानंतर शिवसेनेने काँग्रेस आघाडीला सोबत घेऊन सत्तेची रिक्षा चालू केली हे आपण बघतो आहोत. पहाटेचा शपथविधीही आपणास माहीत आहे. त्यामुळे निकाल लागून शपथ घेईपर्यंत आणि बहुमत सिद्ध करेपर्यंत कुणाचेच काही खरे नाही. ज्या राज्यात एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळत नाही आणि युती-आघाडी जोड-तोड करुन सत्तेची गणिते जमवावी लागतात तेथे घोडेबाजार भरतात आणि विकासाच्या केवळ वल्गनाच होतात असे स्पष्ट दिसते. यामध्ये लोकहित, प्रांतहित, देशहित नसते. मतदारांनी पै, पाहुणा, जातवाला, ओळखीचा या पलीकडे जाऊन देशहित व प्रांतहित बघून मतदान केले पाहिजे आणि कुणा एका पक्षाला, नेत्याला स्पष्ट व भक्कम कौल दिला पाहिजे. त्यातून विकासाकडे पावले टाकायचा रेड कारपेट अंथरला जाईल हे सर्वांनी मनोमन लक्षात घेतले पाहिजे. मतदान व राजकारण हे गुणवत्तेवर आणि दूरदर्शीपणे विकासाच्या मुद्यावर झाले पाहिजे. त्यातूनच सार्वत्रिक भले होण्याची शक्यता आहे. बिहारमधील बदल असो वा अमेरिकेतील त्याचा देशाचा राजकारणावर कमी-अधिक परिणाम होत असतो. अमेरिका ही जगातील मोठी सत्ता, प्रभावी सत्ता मानली जाते. अमेरिकन भूमिकांचा जगभर प्रभाव पडत असतो. अमेरिकेत झालेल्या बदलाचा भारतावर काय परिणाम होणार अशी चर्चा व उत्सुकता स्वाभाविक आहे. मोदी आणि ट्रम्प यांची मैत्री, आलिंगने आणि भेटीगाठी यांच्या चर्चा आजही होत असतात. तो पॉलिसीचा आणि डिप्लोमसीचा भाग असतो पण अलीकडे चीन, पाकिस्तान यांनी भारताशी घेतलेला पंगा आणि सीमेवरची तणाव स्थिती, हल्ले, सर्जिकल स्ट्राईक या पार्श्वभूमीवर नव्या अमेरिकन सत्तेशी भारताचे संबंध कसे राहणार हा महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा मानला जातो आहे. बायडन हे वयाने ज्येष्ठ आहेत आणि भारताचे समर्थक मानले जातात. ट्रम्प यांनी कोरोना साथीच्या काळात भारताकडून औषध पुरवठा व्हावा यासाठी वापरलेली भाषा आणि भारतातील अस्वच्छतेवरून केलेली शेरेबाजी किंवा त्यांच्या भूमिका आणि वक्तव्ये यावरुन ते वादग्रस्त ठरले होते. अमेरिकेत अनेक भारतीय तरुण नोकऱया, उद्योग करत आहेत. त्यांची संस्थाही मजबूत आहे व नुकत्याच झालेल्या या निवडणुकीतही काही भारतीय निवडून आले आहेत. भारतीय वंशाच्या कमला हॅरिस उपराष्ट्राध्यक्ष होणार अशी शक्यता आहे. प्रचारादरम्यान जो बायडन यांनी दहशतवादाविरोधात आपण भारतासोबत राहू असे म्हटले होते. पंतप्रधान मोदी लवकरच या सत्तेबरोबर आणि व्यापार धोरण, संबंध या सर्व पातळीवर बायडन यांच्याशी सलोखा ठेऊन भारतीय परराष्ट्र धोरण नेटके करतील हे सांगायला नको. अमेरिकेची निवडणूक असो व बिहारची, या निवडणुकीला कोरोनाचा रंग होता. भीतीचे सावट होते. अडचणीत आलेली अर्थव्यवस्था आणि जागतिक स्थिती होती. अजूनही हे संकट संपलेले नाही. यासाठी सत्तांतर असो, राजकारण असो या संकटाचे भान सर्वांना ठेवावे लागेल. हे भान ठेवूनच पावले टाकली पाहिजेत. एक मात्र खरे की सत्तांतराचे वारे वाहत आहे. जनसमान्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अपेक्षा उंचावल्या आहेत. चांगले काम करत सत्ता राखणे आणि सर्वांचे हित सांभाळणे हे आव्हान आहे. लहान-मोठय़ा सर्वच निवडणुकात राजकीय नेत्यांची व पक्षांची कसोटी लागणार आहे.
Previous Articleट्रंप, आर्ट बुकवाल्ड आणि रमेश मंत्री
Next Article पदवीधर मतदार संघात विजय निश्चित : संग्रामसिंह देशमुख
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.