आम्ही चालवू हा पुढे ‘वारसा’
‘बाप-लेक सीएम’ची देशात डझनाहून अधिक उदाहरणे
राजाचा मुलगा राजा बनणार अशी मानसिकता असणाऱया आपल्या देशात घराणेशाही अगदी लोकशाहीच्या पाचवीला पुजलेली आहे. त्यामुळेच देशभर लोकशाहीतील अनेक राजकीय घराण्यांचा गेल्या सत्तर वर्षात उदय झाला. आदिवासी राज्ये असोत वा प्रचंड नागरीकरण झालेली, गरीब-बिमारू असोत किंवा श्रीमंत-पुढारलेली. पित्यानंतर पुत्र इतकेच नव्हे तर मुलींनाही मुख्यमंत्री पित्याचे उत्तराधिकारी बनण्याचे भाग्य जनतेने अनेकांच्या पदरी दिले आहे. कर्नाटकात बसवराज बोम्माई यांनी नुकतीच भाजप सरकारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांचे वडील एस. आर. बोम्माई हेदेखील एकेकाळी कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. याच निमित्ताने देशातील अशा पूर्वसुरी आणि उत्तराधिकारी मुख्यमंत्र्यांचा हा धावता आढावा….
कर्नाटकात नुकतेच बसवराज बोम्माई हे भाजपचे मुख्यमंत्री आणि बी. एस. येडियुराप्पांचे उत्तराधिकारी म्हणून विराजमान झाले असले तरी त्यांचा भाजपचा संबंध 2008 पासूनचा. येडियुराप्पा यांनीच त्यांना जनता दल युनायटेडमधून भाजपमध्ये आणले. पुत्राकडून कारभारात हस्तक्षेपाचा आरोपातून पदत्यागाची वेळ आली तेव्हा लिंगायत समाजाच्याच गृहमंत्री बसवराज यांना त्या पदावर विराजमान केले. बसवराज बोम्माई हे त्यांच्या कुटुंबातील पहिले नव्हेत. त्यांचे पिता आणि जनता दलाचे राष्ट्रीय नेते एस. आर. बोम्माई हे त्यांच्यापूर्वी या राज्याचे मुख्यमंत्री होऊन गेले. आपल्या कार्यकाळात कर्नाटकात जमीन सुधारणा, दुष्काळ मुक्ती, आयआयटी, आयआयएम सारख्या संस्था उभारण्याचा मान त्यांना जातो. तसेच राज्यपालांनी सरकारच्या बहुमताचा निर्णय न घेता तो विधानसभेच्या सभागृहातच निश्चित झाला पाहिजे यासाठी त्यांच्या सरकारचे झालेले समर्पण आणि त्यावर आधारित सरकार विरुद्ध बोम्माई खटलाही वेळोवेळी देशभर चर्चा आणि निर्णयाचा आधार असतो !
आजा-मुलगाöनातू आणि बाप लेक मुख्यमंत्री!
काश्मीर हे असे राज्य आहे जिथे एका गरीब परिवारातील शेख अब्दुल्ला या युवा नेत्याने स्वातंत्र्यापूर्वी 1930 च्या दशकात काश्मीरातील राजा हरिसिंग यांच्या राजेशाही विरुद्ध मुस्लीम कॉन्फरन्सची स्थापना करून आवाज उठवला. त्याला मिळालेल्या सर्व समाजाच्या प्रतिसादामुळे त्याचे नामांतर नॅशनल कॉन्फरन्स असे केले. आंदोलनाच्या दबावाने तिथे जम्मू काश्मीर असेंब्ली आणि संविधान अस्तित्वात आले. हरिसिंग जेव्हा भारतात सामील न होता स्वतंत्र राष्ट्र बनविण्याच्या विरोधात होते तेव्हा तिथे उठाव झाला. काश्मीरचा भारतात विलय झाला मात्र निवडणुका होण्यास 1957 साल उजाडले. 89 पैकी 75 जागा अब्दुल्ला यांनी जिंकल्या. मात्र फुटीरवादी वक्तव्यामुळे नेहरूंनी त्यांना दक्षिण भारतात नजरबंदी केले. 1971 मध्ये भारत पाक युद्धानंतर 1974 साली शेख-इंदिरा करार होऊन शेख अब्दुल्ला मुख्यमंत्री बनले. 1981 साली प्रकृतीचा अंदाज येताच त्यांनी पुत्र डॉ. फारुख यांना नॅशनल कॉन्फरन्सचा अध्यक्ष बनवले. पुढच्याच वषी शेख यांचे निधन होऊन पुत्र फारुख अब्दुल्ला मुख्यमंत्री बनले. 1987 साली राजीव गांधी यांच्या काळात फारुख आणि काँग्रेस युती होऊन झालेल्या या निवडणुकात त्यांच्या युतीचा पराभव झाला होता आणि फुटीरवादी मुस्लीम युनायटेड प्रंट सत्तेवर येणार असे दिसताच निवडणूक निकालात गोंधळ घातला असा आरोप आजही होतो. 1987 ते 1991 या काळात काश्मीर जळत राहिला. अखेर राज्य लष्कराच्या ताब्यात देऊन शांत केले गेले. 1996 साली डॉ. फारुख यांनी वाजपेयी यांच्याशी युती केली. 2002 निवडणुकीनंतर डॉ. फारुख यांनी आपला पुत्र ओमर अब्दुल्ला यांनी राजकारणात सक्रिय केले. अध्यक्ष बनवले नंतर ते मुख्यमंत्री झाले. एकच घरातील आजोबा, बाबा आणि मुलगा मुख्यमंत्री झाल्याचे हे देशातील एकमेव उदाहरण!
1989 साली व्ही. पी. सिंग सरकारमधील केंद्रीय गृहमंत्री मुफ्ती महंमद सईद यांची कन्या रुबी यांचे अतिरेक्मयांनी अपहरण केल्याने चर्चेत आलेल्या या घराण्यात आधी मुफ्ती मुख्यमंत्री बनले. त्यांचा पक्ष पीडीपी आणि भाजपची युती झाली. पुढे मुख्यमंत्री असतानाच त्यांचे निधन होऊन मेहबुबा मुफ्ती या त्यांच्या कन्या मुख्यमंत्री बनल्या. पुढे ही युतीही मोडली. 2019 मध्ये समान नागरी कायदा रद्द केल्याच्या निमित्ताने हे सर्वच नेते केंद्र सरकारने बंदिवासात ठेवले होते. नुकतेच त्यांना चर्चेसाठी दिल्लीत बोलावले होते. भविष्यात यापैकी कोण केंद्रीय सत्तेशी जुळवून घेऊन पुन्हा सत्तेत येईल याची उत्सुकता आहे.
मध्यप्रदेश ः
मध्यप्रदेश हे बहुधा देशातील पहिले राज्य आहे जेथे वडील-मुलगा जोडी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. 1956 मध्ये रविशंकर शुक्ला हे राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले आणि ते केवळ 61 दिवस या पदावर राहू शकले. पण त्यानंतर 13 वर्षांनंतर 1969 मध्ये त्यांचा मुलगा श्यामा चरण शुक्ल हे राज्याचे सातवे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी तीनवेळा हे पद भूषविले.
कर्नाटक ः देवेगौडा पिता-पुत्र
बोम्माई यांच्या आधी एच. डी. देवेगौडा आणि त्यांचे पुत्र एच. डी. कुमारस्वामी कर्नाटकचे मुख्यमंत्री बनले. शेतकरी नेते देवेगौडा अल्पकाळ देशाचे पंतप्रधान बनले. त्यांचे पुत्र कुमारस्वामी एकदा भाजपबरोबर निम्मी सत्ता वाटून घेण्याचा वायदा करून, तो मोडून मुख्यमंत्री बनले. एकदा काँग्रेसबरोबर युती करून सत्तेवर आले. या सत्तेत बसलो तरी समाधानी नाही असे सांगत कार्यकर्त्यांपुढे अश्रू ढाळणारे मुख्यमंत्री म्हणून इतिहासाने त्यांची दखल घेतली आहे. त्यांची ही कृती त्यांच्या सिने व्यवसायाला शोभेशीच!
तामिळनाडू ः करुणानिधी आणि स्टॅलिन
दक्षिणेत तामिळनाडूचे आपल्या द्रविड संस्कृतीवर खूप प्रेम. तसेच सिनेमावरही! इथले सर्व नेते सिनेमाशी संबंधित. खेचक संवाद आणि खेचकच राजकारण. या राजकारणावर जयललिता आणि करुणानिधी या पारंपरिक विरोधकांनी प्रत्येक पंचवार्षिक आलटून-पालटून राज्य केले. आपल्या प्रेक्षकाला आपल्या राजकारणाशी जोडून घेतले आणि अंतिम क्षणापर्यंत नेतृत्व केले. करुणानिधी पुत्र स्टॅलिन राजकारणात आले वयाच्या विशित. पण मुख्यमंत्री बनले सत्तरीत! पक्षाची प्रखर भूमिका कायम करणारा हा मुख्यमंत्रीही सिने आणि मालिकांमधून चमकून अभिषिक्त झाला आहे!
आंध्रप्रदेश ः लाटेवर स्वार रेड्डी पितापुत्र
दक्षिणेतील आणखी एक चमत्कारिक राज्य म्हणजे आंध्रप्रदेश. प्रादेशिक अस्मिता जागृत करून एन. टी. रामाराव यांनी काँग्रेसला राज्यातून दूर केले. त्यांचे जावई चंद्राबाबू यांनी तो वारसा चालवला. पण फीलगुडच्या लाटेवर ते स्वार झाले असताना वाय. एस. राजशेखर रेड्डी यांनी त्यांना वास्तवात खेचले. 2004 मध्ये राज्यभर पदयात्रेला काढून राज्य पुन्हा काँग्रेसमय केले. मुख्यमंत्री रेड्डींचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले आणि अन्य नेत्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना दूर लोटले. पुत्र जगनमोहन रेड्डी यांना सत्तेच्या काँग्रेस अंतर्गत राजकारणातून अवैध पैशाच्या प्रकरणी जेलवारी घडली. मात्र बाहेर आल्यानंतर विरोधी पक्षनेते बनले. 2019 मध्ये त्यांनी पित्याप्रमाणेच पदयात्रा काढून वायएसआर काँग्रेस नावाने प्रादेशिक पक्ष स्थापला. प्रचंड लोक संपर्कामुळे राज्यात एकहाती भरभक्कम सत्ता मिळवून केंद्रीय सत्तेशी जुळवून लोकप्रिय आहेत.
महाराष्ट्र ः शंकरराव-अशोकराव
1975 ते 1977 आणि 1986 ते 1988 असे दोनदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. नंतर देशाचे अर्थ, गृह अशी सर्वोच्च पदे मिळविणारे शंकरराव चव्हाण परिचित आहेत कडक शिस्तीचे म्हणून. महाराष्ट्रात जल संस्कृती जपणारे, अनेक धरणे, पाणी योजनांना मंजुरी देणारे आणि झिरो बजेट राबवणारे म्हणूनही प्रसिद्ध. पुत्र अशोकराव यांना तरुणपणी खासदार बनवून त्यांनी राजकारणाची दीक्षा दिली. राज्यात अनेक मंत्रीपदे मिळवून 2008 ते 10 या काळात ते मुख्यमंत्री झाले. मात्र आदर्श सोसायटी घोटाळय़ात गोवले गेल्याने राजीनामा द्यावा लागला. वडीलांप्रमाणेच तेही मुख्यमंत्री होऊन पुन्हा कॅबिनेट मंत्री बनले.
गोवा ः भाऊसाहेब आणि शशिकलाताई!
गोव्याचे प्रथम मुख्यमंत्री दयानंद बाळकृष्ण तथा भाऊसाहेब बांदोडकर यांनी आपल्या दहा वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत गोव्याला एका उंचीवर पोहचवले. 1963 साली पहिल्या निवडणुकीत विधानसभा सदस्य नसतानाही ते लोकाग्रहामुळे मुख्यमंत्री बनले. 1967 साली सार्वमत घेतल्यानंतरच्या निवडणुकीतही त्यांना यश मिळाले. त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या कन्या आणि मंत्रिमंडळ सहकारी शशिकलाताई काकोडकर मुख्यमंत्री बनल्या. त्यांची कारकीर्द यशस्वी आणि वादळीही ठरली. पक्षांतर्गत बंडळीमुळे त्यांना दुसऱया कार्यकाळात पद सोडावे लागले. पण देशाने त्यांच्या रूपाने एक सक्षम महिला मुख्यमंत्री अनुभवल्या.
मेघालय ः संगमा पिता-पुत्र
तब्बल आठ वेळा खासदार झालेले पी. ए. संगमा लोकसभा अध्यक्ष म्हणून देशाला माहीत आहेत. मात्र 1988 ते 1990 असे दोन वर्षे ते मेघालय चे मुख्यमंत्रीही होते. त्यांची कन्या अगाथा संगमा या देशातील सर्वात युवा केंद्रीय मंत्री बनल्या होत्या. तर पुत्र कोनराड संगमा ऐन चाळीशीत मेघालयचे मुख्यमंत्री बनलेले आहेत. खासदार, राज्यात मंत्री, विरोधी पक्षनेता अशा जबाबदाऱया स्वीकारत ते मुख्यमंत्री बनले.
हरियाणा ः शेतकरी नेत्याचा गोतावळा
‘हरियाणा के ताऊ’ म्हणून ओळख असणारे दिग्गज शेतकरी नेते देवीलाल यांनी राज्याचे मुख्यमंत्रिपद तर पटकावले उपपंतप्रधानसुद्धा झाले. पण पुत्र ओमप्रकाश चौटाला पाचवेळा मुख्यमंत्री झाले. आता तर पुतण्याने भाजपला साथ देऊन उपमुख्यमंत्रिपदापर्यंत मजल मारली आहे. घरात कुरुक्षेत्र घडले तरी सत्तेत वाटा आहेच!
अरुणाचल प्रदेश ः
अरुणाचल प्रदेशात मुख्यमंत्री पेमा खांडू आणि त्यांचे वडील दोरदी खांडू हेसुद्धा राज्याचे मुख्यमंत्री होते.
ओडिशा ः
ओडिशामध्ये नवीन पटनायक यांचे वडील बीजू पटनायक हे सुद्धा मुख्यमंत्री होते. सध्या ओडिशामध्ये असलेले मुख्यमंत्रीही वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवून मुख्यमंत्री झाले. नवीन पटनायक हे सध्या राज्यात मुख्यमंत्री आहेत आणि त्यापूर्वी त्यांचे वडील बिजू पटनायकही मुख्यमंत्री होते. नवीन हे मागील दीड तपाहून अधिक काळ राज्यात मुख्यमंत्री आहेत.
झारखंड ः झारखंडमध्येही वडिलांच्या नंतर मुलाने राज्याची सत्ता स्वीकारली आणि राजकीय घराण्याला नवी उंची दिली. शिबू सोरेन यांच्यानंतर त्यांचा मुलगा हेमंत सोरेन मुख्यमंत्री झाले. झारखंडमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीत हेमंत सोरेन यांनी बाजी मारत मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मिळवली. त्यांचे वडील शिबू सोरेन यांनीही राज्याची सूत्रे सांभाळली होती.